चालक दलाच्या सदस्यांनाही रोखले
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 700 हून अधिक जहाजांच्या 25000 पेक्षा अधिक प्रवासी तसेच चालक दलाच्या सदस्यांना भारतीय किनाऱयावर उतरू दिलेले नाही. माल भरणे तसेच तो उतरविण्यावर बंदीसह सरकारने कोरोनाग्रस्त देशांमधून येणाऱया कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रूज, चालक दलाचे सदस्य तसेच प्रवाशांना भारतीय किनाऱयावर उतरू दिले नाही. देशाच्या प्रमुख बंदरांवरील ही बंदी 1 फेब्रुवारीनंतर कोरोनाग्रस्त देशांचा प्रवास करणाऱया लोकांवर लागू आहे.
13 मार्चपर्यंत चीन किंवा कोरोनाग्रस्त अन्य देशांमधून आलेल्या 703 जहाजांमधून एकूण 25504 प्रवासी तसेच चालक दलाचे सदस्य भारतीय किनाऱयावर पोहोचले होते. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या लोकांना भारतीय हद्दीत प्रवेशाची अनुमती नाकारण्यात आली आहे. या जहाजांना किनाऱयावर निर्धारित ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले. 26 जानेवारीनंतर अशा प्रवाशांना किंवा जहाजावरील कर्मचाऱयांना किनाऱयावर उतरण्यास आवश्यक संमती नाकारण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांनुसार जहाजांवरील सर्व प्रवासी तसेच कर्मचाऱयांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
भारतात एकूण 12 मोठी बंदरे असून यात दीनदयाळ मुंबई, जेएनपीटी, मार्मागुआ, न्यू मंगळूर, कोची, चेन्नई, कामराजार, व्ही.ओ. चिंदबरनार, विशाखापट्टणम, पारादीप आणि कोलकाता यांचा समावेश आहे. या बंदरांमधून 2018-19 मध्ये 699.04 मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली होती. याचबरोबर भारतात 200 छोटी बंदरे असून त्यांचे नियंत्रण राज्यांच्या हाती आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यातच सर्व 12 प्रमुख बंदर प्राधिकरणांना सागरी प्रवास करणाऱया लोकांसाठी तत्काळ स्क्रीनिंग, डिटेंशन आणि क्वारेंटाईन व्यवस्था सुरू करण्यास सांगितले होते. सरकारने बंदर प्राधिकरणांना एन-95 मास्क उपलब्ध करण्यासह प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.