वार्ताहर / गोकुळ शिरगाव
करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली. आज, शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये वीस ते पंचवीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोकुळ शिरगाव येथे रेखा मनोहर पाटील, भारती रतन पाटील, भीमराव कृष्णा पाटील व भुजंगा हनमा पाटील या चौघांच्या घराला आज पहाटे पाचच्या सुमारास घरातील विद्युत प्रवाहात शॉर्टसर्किट झाल्याने या घराला आग लागली. यामध्ये आगीने घरातील सर्व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घरातच असलेले कापड दुकान आगीच्या भक्षस्तानी पडले. यावेळी मोठ्या प्रमाणात दुकानातील साड्या आणि इतर कपडे, घरात असलेले पैसे, सोने व धान्य संपूर्ण जळून खाक झाले. या आगीत कुटुंबाची जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये पर्यंतचे नुकसान झाले आहे. संपूर्ण घरे डबल मजली असल्याने यामध्ये लाकडी जिने व फळयांचा मोठ्या प्रमाणात वापर असल्याने आगीने पहाटेच्या सुमारास रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गाव याठिकाणी जमा झाला.
या घराला लागूनच आजूबाजूला जवळपास भरपूर घरे आहेत. त्यामुळे गावातील तरुण मंडळांनी या आगीचा विचार करून सुरुवातीला कागल पंचतारांकित मधील अग्नि बंब बोलावले. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेतील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यामध्ये नवनाथ साबळे, उमेश जगताप, अजित केरकर, प्रमोद मोरे, तर कागल पंचतारांकित मधून नेरकर, चव्हाण, वरेकर यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले.
यावेळी गोकुळ शिरगावचे माजी सरपंच संदीप पाटील व उद्योजक राजू गोरे यांनी या आगीमध्ये या चारी घरांचे जवळपास वीस ते बावीस लाखापर्यंत चे नुकसान झाले असल्याचे सांगितले.