कार्यक्रमात वीर नारींचा सन्मान : हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर’कडून 76 वा इन्फंट्री (पायदळ) दिन 27 रोजी पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पायदळाच्या शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी शर्कत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याशिवाय वीर नारींचा सन्मान करण्यात आला. नॅशनल मिलिटरी स्कूल, केंद्रीय विद्यालय, कित्तूर राणी चन्नम्मा स्कूलच्या तसेच एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्रीनगर येथील हवाई दलाच्या तळावर भारतीय सैन्याच्या शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनचे दाखल होणे आणि 1947 मध्ये काश्मीर काबीज करण्याकरिता पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने पाकिस्तानी आदिवासी हल्लेखोरांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे उधळून लावणे यांच्या स्मरणार्थ भारतीय सैन्य दरवर्षी 27 ऑक्टोबर हा दिवस ’इन्फंट्री डे’ म्हणून साजरा करते. याच महत्त्वाच्या दिवशी भारतीय सैन्याने दृढनिश्चय आणि विलक्षण धैर्य दाखवून पाकिस्तानी लष्कराच्या दुष्ट मनसुब्यांना हाणून पाडले होते आणि त्यामुळे एक अजोड संरक्षक भिंत म्हणून सैन्याला ओळखले जाऊ लागले.
त्यावेळी स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत प्रथमच आक्रमकांविरुद्ध कारवाई करण्यात गुंतला होता. याच ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. तेव्हा आणि त्यानंतर अनेकदा देश रक्षणाच्या बाबतीत आपल्या पायदळाने उत्कृष्ट भूमिका बजावलेली आहे. जवानांचे हे शौर्य लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
पायदळाला ‘युद्धाची राणी’ नाव सार्थ
पायदळ हे जवळच्या लढाईचे एक प्रमुख दल आहे. यामध्ये जमिनीवरील शत्रू सैन्याचा सामना करून त्याला पकडणे किंवा त्याचे आव्हान मोडीत काढण्याची जबाबदारी असते. सामरिक व रणनीतीच्यादृष्टीने पायदळाची भूमिका महत्त्वाची असते आणि ते शेवटपर्यंत बचाव करतात. ही महत्त्वाची भूमिका इन्फंट्रीला युद्धात विजय मिळविण्याच्यादृष्टीने सर्वांत प्रमुख आणि निर्णायक शस्त्र बनविते. म्हणूनच त्याला ‘युद्धाची राणी’ असे म्हटले जाते, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.