जतमध्ये संचारबंदी, तरीही दारू विक्री, अवैध धंदे : आ विक्रम सावंत
प्रतिनिधी / जत
राज्यभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही जत शहरासह तालुक्यात चोरून दारू, गुटखा, मावा यासह जुगार व मटका सुरूच आहे, याकडे पोलिसांचे का दुर्लक्ष होत आहे, हेच समजत नाही असा उपरोधिक टोला जतचे आमदार विक्रम सावंत यांनी लगावला आहे, त्यामुळे निर्ढावलेले जत पोलीस आतातरी ताळ्यावर येणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रविवारी जत येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोनो व तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजीत केली होती.या बैठकीत आमदार सावंत यांनी जत व उमदी पोलिसांची पोलखोल केली.आमदार सावंत यांनी मांडलेल्या विषयावर पालकमंत्री देखील अवाक झाले.त्यांनी जत मधील सर्वच अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असे आदेश देत संचारबंदी आणि कोरोनोचा मुकाबला करताना असे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.
त्यांनी संचारबंदी च्या काळात पोलीसांच्या धास्तीने अत्यावश्यक सेवेसाठीही माणसे बाहेर फिरत नाहीत.अशी अवस्था असतानाही तालुक्याच्या सीमावर्ती भागात मात्र दारू अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. यात दारूची मान्यताप्राप्त दुकाने बंद आहेत.मग तालुकाभर राजरोसपणे दारू विक्री होतेच कशी ? अनेक गावातील संरपच थेट मला फोन करतात, अनेक वेळा पोलीसांना सांगूनही कारवाई होत नाही,असा पोलीसांच्या कारभाराचा पाढाच आ.सांवत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीत मांडला.
एका मोठ्या कारवाईचे गौडबंगाल ?
जत तालुक्यातील एक मोठया गावात दारू विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईत काळबेर झाल्याची चर्चा आहे.संचारबंदीत झालेल्या या कारवाईत मोठे गौडबंगाल दडले आहे, या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी हकनाक तडका फडकी बदली होऊन गेले, पण ज्या अधिकाऱ्याची ही करामत आहे तो मात्र रामराज्य आसल्याचे भासवत आहे, याचीही जोरात चर्चा आहे.या रामराज्य पोलिसी कारभाराचा सखोल पंचनामा करावा, अशी मागणी देखील नागरिकांतून होत आहे.