संजीव खाडे / कोल्हापूर
कोरोनाचा प्रार्दुभाव, संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेले नियम आणि दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करा. व्यापक समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी शासनाचे आदेश महत्वाचे आहेत. त्यांचे पालन करा, असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले आहे. धर्म ही वैयक्तिक बाब असून तिचे घरीही पालन करता येते. शासनाने केलेले नियम हे धर्माला अनुसरून आहेत, असेही त्यांनी सांगितले.
करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धर्म, धर्मकार्य यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या गोष्टींवर मार्गदर्शन केले. त्यांच्याशी झालेला संवाद.
प्रश्न ः सध्या कोरोनाच्या संकट काळात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर तिच्या उत्तरकार्य विधी, क्रियाकर्माविषयी अडचणी आल्यास काय करणे आवश्यक आहे?, धर्मशास्त्र काय सांगते?
शंकराचार्य स्वामीजी ः वेद संस्कृतीने दिवस कार्य करायला सांगितले आहे. तो सोळा संस्ककारांपैकी (गर्भादान ते अंत्येष्टी पर्यंत असे सोळा संस्कार) एक संस्कार आहे. पहिले पंधरा संस्कार आई, वडील आपल्या मुलांवर करतात. मात्र सोळावा संस्कार मुले आई, वडिलांच्या निधनानंतर क्रियाकर्म करून पूर्ण करत असतात. धर्मशास्त्रानुसार हे सर्व संस्कार करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळीही महामारी, रोगराई येत असे. त्य़ामुळे आपत्काल, आणीबाणीची स्थिती गृहित धरून धर्मशास्त्राने सुव्यवस्थित असे मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार मृत्युच्या दिवसापासून 29 दिवसापर्यंत संबंधित मृत व्यक्तीची सर्व उत्तरकार्य, क्रियाकर्मे विधी (दशांत क्रिया) करता येतात.
प्रश्न ः एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची मुले, परिवाराला दहा दिवसाचे सुतक असते, इतरांपासून बाजूला राहण्यास सांगितले जाते. त्यामागचे धर्मशास्त्र काय आहे?
शंकराचार्य स्वामीजी ः हा सोळाव्या संस्कारातील एक भाग आहे. आई, वडिलांनी मुलांवर पंधरा संस्कार केलेले असतात. त्यांच्या निधनानंतर मुलांनी सोळावा संस्कार करावा, असे धर्मशास्त्र सांगते. दशांत विधीबरोबर दहा दिवस बाजूला राहणे याला अशौच असे म्हणतात. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी ते अशौच पाळावे. हेरिटेटीची अडचण येवू नये, तसेच संसर्गजन्य अशा काही गोष्टी होवू नये, हा हेतू आहे.
प्रश्न ः सध्या लग्न सराईचा काळ आहे. मुहूर्त आहेत. पण कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अनेकांचे विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्या विषयी काय सांगाल?
शंकराचार्य स्वामीजी ः ‘धर्मशास्त्राने सर्वकाले विवाह कर्तव्य’ असे सांगितले आहे. पण त्याला काही अपवादही सांगितले आहेत. भाद्रपद वद्य पक्ष अर्थात पितृपक्षात विवाह करून नये असे सांगितले आहे. पौष महिनाही विवाहास वर्ज्य केला आहे. कारण पौष महिन्यात घरावर ध्वज लावून वाऱयाचा अंदाज घ्यावा आणि त्यावरून येणाऱया पर्जन्यमानाचा अंदाज घ्यावा. त्यावर पावसाचा अंदाज सिद्ध होत असतो. इतर काळात विवाह करता येतो. तिरूपतीच्या छायेखाली (पर्वताच्या छायेखाली) आमावास्येला विवाह करण्याची परवानगी दिली गेली आहे. पर्यायांचा वापर करावा. परंतु पर्याय म्हणजे मूळ नियम होऊ शकत नाहीत, हे देखील ध्यानात ठेवण्याची गरज आहे.
प्रश्न ः सध्या संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात जर नित्येपोचार, दिवस कार्यासाठी भटजी उपलब्ध झाला नाही. तर मध्यस्थाविना क्रियाकर्म पार पाडण्याचा उपाय धर्मशास्त्रात आहे काय?
शंकराचार्य स्वामीजी ः मानसिक पूजा हा उपचार आहे. त्याचबरोबर कालमर्यादा पुढे ढकलण्याची मुभाही आपत्कालात धर्मशास्त्राने दिली आहे. पंचमीचे श्राद्ध असेल तर ते व्दादशीला किंवा पुढे येणाऱया आमावास्येला करू शकता. सर्व स्थितीचा विचार करून धर्मशास्त्राने आपल्याला पर्याय दिले आहेत. कुठलीही गोष्ट धर्मशास्त्रातून बाजूला राहिलेली नाही. त्यामुळे धर्माच्या दृष्टीने सोयिस्कर असलेला पर्याय वापरावा.
प्रश्न ः कोरोनामुळे लॉकडाऊन वाढत गेला तर एखाद्या रोगाच्या साथीने आषाढीची वारी, एकादशीची पूजा त्याचबरोबर गणेशोत्सवावर परिणाम होणार असेल तर धर्मशास्त्र काय सांगते?
शंकराचार्य स्वामीजी ः यापूर्वी विविध रोगाच्या साथी येवून गेल्या आहेत. प्लेगची साथही गेल्या शतकात आली होती. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. त्याप्रमाणे आता कोरोनाच्या रूपाने साथ आली आहे. पहिले वारकरी हे आद्य शंकराचार्य आहेत. त्यांनी पांडुरंगाष्टक लिहून ठेवले आहे. त्यात विवेचन केले आहे.
प्रश्न ः सध्या कोरोनाच्या काळात शासन आदेश पाळला पाहिजे की धर्माचा आदेश पाळला पाहिजे?
शंकराचार्य स्वामीजी ः व्यापक समाजहित, राष्ट्रहितासासाठी शासनाचा आदेश, नियम पहिल्यांदा पाळले पाहिजेत. धर्म वैयक्तिक बाब आहे. त्याचे पालन आपण घरीही करू शकतो. मात्र सध्याच्या स्थिती शासन आदेश, नियम पाळणे राष्ट्रहिताचे आहे. कारण शासन, शासन प्रमुख हा विष्णूचा अवतार असल्याचे धर्मशास्त्र मानते. त्याचा आदेश पाळणे सर्वांचे कर्तत्व आहे. शासनानेही केलेले नियम, दिलेले आदेश धर्मशास्त्राला अनुसरून आहेत.