मानिकतल्ला विधानसभा मतदारसंघ – तृणमूल-भाजप-माकप यांच्यात लढत
कोलकात्यातील हाय-प्रोफाइल मानिकतल्ला विधानसभा मतदारसंघात 8 वेळचे आमदार आणि माजी भारतीय गोलरक्षक कल्याण चौबे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत दिसून येत आहे. तर संयुक्त मार्चाच्या वतीने माकप उमेदवार रुपा बागची देखील विजयासाठी पूर्ण शक्ती लावत आहेत. ममता सरकारमधील मंत्री साधन पांडे मागील 10 वर्षांच्या विकासकामांचा दाखला देत हॅटट्रिकची हॅटट्रिक करण्याप्रकरणी पूर्णपणे आश्वस्त आहेत. तर साधन पांडे यांच्या निवृत्तीची वेळ आली असल्याचे कल्याण चौबे म्हणत आहेत. तर एक दशकापूर्वी याच मतदारसंघातील आमदार राहिलेल्या रुपा बागची तृणमूल सरकारचे अपयश मांडत आहेत. मानिकतल्लामध्ये आठव्या आणि अंतिम टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
बंगालमध्ये जेव्हा कधी राजकीय पक्ष मजबूतपणे उदयास आला, त्यांच्या प्रतिनिधींना संधी देणे हे मानिकतल्लाच्या मतदारांचे वैशिष्टय़ राहिले आहे. याच कारणामुळे कल्याण चौबे भाजपला संधी देण्याचे आवाहन करत आहेत. या मतदारसंघात 1952 ते 1969 पर्यंत भाकपचे एकछत्री वर्चस्व राहिले आहे. 1971 च्या पोटनिवडणुकीत येथे माकपने विजय मिळविला. 1996 मध्ये काँग्रेसने माकपला पराभूत करत यावर कब्जा केला. तर पुढील वर्षी या मतदारसंघात तृणमूलची सरशी झाली. पण 2006 साली माकप पुन्हा एकदा या मतदारसंघात विजयी ठरला. तर 2011 च्या परिवर्तनाच्या लाटेत येथील मतदारांनी तृणमूलच विश्वास दाखविला. तेव्हापासून यावर तृणमूलचा कब्जा आहे. आणि साधन पांडे येथे मागील एक दशकापासून आमदार आहेत. यापूर्वी ते बडतल्ला मतदारसंघात 6 वेळा विजयी झाले होते. पुनर्रचनेमुळे बडतल्ला मतदारसंघाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
तृणमूलची मतांची टक्केवारी घटली
मागील विधानसभा निवडणुकीत पूर्ण राज्यात प्रचंड विजय नोंदविल्यावरही या मतदारसंघातील तृणमूलच्या मतांची टक्केवारी घटली होती. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला येथे 60.05 टक्के मते मिळाली होती. तर 2016 च्या निवडणुकीत तृणमूलची मते 9.45 टक्क्यांनी कमी होत 50.60 टक्क्यांवर आली होती. याउलट मागील विधानसभा निवडणुकीत भाजपची मते लक्षणीय प्रमाणात वाढली आहेत. 2011 मध्ये भाजपला येथे केवळ 2.47 टक्के मते मिळाली होती. 2016 मध्ये मात्र हे प्रमाण 12.55 टक्क्यांवर गेले होते. यंदा तर भाजपच मुख्य प्रतिस्पर्धी ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीत अपयशी
मानिकतल्ला मतदारसंघातील तिन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरले आहेत. साधन पांडे यांनी 1998 मध्ये तत्कालीन कलकत्ता उत्तर-पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर कल्याण चौबे यांना 2019 मध्ये कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली होती. रुपा बागची देखील 2014 मध्ये कोलकाता उत्तर मतदारसंघात पराभूत झाल्या होत्या.