नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
दिल्लीच्या निवडणुकीतही ‘पाकिस्तान’चा प्रवेश झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाहिनबागच्या निदर्शकांच्या पाठिशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आपचे माजी आमदार तसेच सद्यकाळातील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी या मुद्दय़ात ‘पाकिस्तान’ला ओढले आहे. दिल्ली निवडणूक म्हणजे ‘हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान’ असल्याचे म्हणत 8 फेब्रुवारी रोजी मतदानाच्या दिनी दोघांमध्ये महालढत होणार असल्याचे विधान केले आहे.
आप आणि काँग्रेसने शाहीनबाग सारखे मिनी पाकिस्तान निर्माण केले आहेत. याच्या प्रत्युत्तरादाखल 8 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान उभा राहणार आहे. देशद्रोही भारतात पाकिस्तान उभा करतील, तेव्हा देशभक्तांचा हिंदुस्थान उभा राहणार असल्याचे मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे. सिसोदियांनी शाहीन बागच्या निदर्शकांना पाठिंबा दर्शविला होता. यावर मिश्रा यांनी या निदर्शनाला पाकिस्तानी दंगलखोरांचा दिल्लीवरील कब्जा ठरविले आहे.
पाकिस्तानी दंगलखोर
शाहीनबागमध्ये पाकिस्तानचा प्रवेश झाला आहे. दिल्लीत छोटे छोटे पाकिस्तान निर्माण केले जात आहेत. शाहीन बाग, चांद बाग, इंद्रलोकमध्ये देशाचा कायदा पाळला जात नाही. पाकिस्तानी दंगलखोरांचा दिल्लीच्या रस्त्यांवर कब्जा असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचीही उडी
भाजप नेते लोकांना पाकिस्तानात पाठविण्याबद्दल बोलत राहतात. पाकिस्तान पर्यटन मंडळ आणि भाजप यांच्यात नेमके काय नाते आहे याची चौकशी व्हावी अशी खोचक टिप्पणी काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.