त्वरित अटक करा : ठेवीदारांनी केली जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांना अनेकवेळा अटक वॉरंट काढण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र त्यांना अटक केली नाही. आता पोलीस अधिकाऱयांना विचारले असता मला याबाबत काहीच माहिती नाही, असे उत्तर दिले जात आहे. एकूणच संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या या भ्रष्टाचाराला पोलीस पाठीशी घालत आहेत, असा आरोप ठेवीदारांनी आणि त्यांच्या वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केला आहे.
ग्राहक न्यायालयामध्ये संगोळ्ळी रायण्णा सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांच्या विरोधात अनेक खटले दाखल होते. त्या खटल्यांचा निकाल लागला आहे. जवळपास 800 खटल्यांमध्ये अटक वॉरंट काढण्यात आले आहे. मात्र पोलीस त्यांच्या घरी जाऊन अटक करण्याऐवजी ते त्याठिकाणी राहत नाहीत, अशी उत्तरे न्यायालयात दिली जात आहेत. सर्वसामान्य जनतेने कष्टाने पैसे या सोसायटीमध्ये ठेव म्हणून ठेवली होती. मात्र जिल्हा प्रशासन याबद्दल काहीच बोलण्यास तयार नाही.
आनंद अप्पुगोळ यांना अटक करून कारागृहात डांबणे महत्त्वाचे आहे. असे असताना पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकतेच पोलीस आयुक्त व उपायुक्तांची भेट घेतली असता मला कारणे दाखवा नोटीस आली नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही, अशी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तातडीने त्याला अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ऍड. एन. आर. लातूर, ऍड. एस. आर. कमते, ऍड. ए. डी. कांबळे, जायण्णा आर्कसाली, अशोक इंगळगी, रामलिंग हुलजी, नारायण लोकळे, प्रकाश मोटे, बसवराज बावलती, मारुती पाटील, यल्लाप्पा बाबण्णावर यांच्यासह ठेवीदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वॉरंट असूनही पोलीस अटक करण्यास टाळाटाळ
काही कर्जदारांनी तसेच सोसायटीच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक जणांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला पैसे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र ते पैसे भरले गेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अनेकांना अटक वॉरंट बजावली आहे. मात्र पोलीस संबंधित व्यक्तीकडे जाऊन 200 ते 500 रुपये घेऊन न्यायालयासमोर ती व्यक्ती तेथे राहत नाही, घर बंद होते, पत्ता चुकीचा आहे, असे पोलीस सांगत आहेत. कर्जदार किंवा सोसायटीचे वॉरंट म्हणजे जणू पोलिसांची चंगळच असल्याचे सध्याच्या प्रकारावरून दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हजारो वॉरंट प्रलंबितच
ग्राहक न्यायालय संबंधित थकितदाराला वॉरंट काढत असते. मात्र पोलीस मोठय़ा चलाखीने टाळाटाळ करत असतात. न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी जे पोलीस न्यायालयात हजर राहतात त्यांच्याकडे ते वॉरंट दिले जाते. मात्र क्वचितच कर्जदार आणि थकबाकीदारांना अटक केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी जर योग्यप्रकारे संबंधित व्यक्तीला न्यायालयात हजर केले तर कर्जवसुली तसेच ठेवीदारांची रक्कम निश्चितच परत मिळेल, असा सूर आता उमटू लागला आहे.