प्रतिनिधी/ दापोली
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळात उत्तर रत्नागिरीची मोठी हानी झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी व येथील पर्यटन क्षेत्राबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लवकरच दापोली व मंडणगडचा दौरा करणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दापोलीतील पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना व सरकार या दोन्ही पातळ्य़ांवर दापोलीत मदतकार्य सुरू आहे. सरकारने सर्व निकष बदलून जास्तीत -जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत येत्या 2 दिवसांत प्रत्येकाच्या खात्यात जमा होईल. पूर्वीच्या निकषांमध्ये मधला टप्पा ठरवणे गरजेचे होते. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून हा मधला टप्पा निश्चित केला आहे. यामुळे सर्वात कमी नुकसान झालेल्यांना व सर्वाधिक नुकसान झालेल्यापैकी ज्यांचे नुकसान 50 टक्के आहे, त्यांनाही सकारात्मक रक्कम मिळणे सोयीचे झाले आहे. येत्या 2 दिवसांत 89 कोटी रुपये मदत या नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा होईल.
कुडावळे व देव्हारे या गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यांना कुडावळे सब स्टेशनमधून वीज पुरवठा करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या 4 दिवसांत तेथील वीज पुरवठा सुरळीत होईल. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून 21 जनरेटर भाडय़ाने पुरवण्यात आले आहेत. ज्या गावात जनरेटर पुरवणे शक्य नाही तेथे टॅंकरने पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या 24 पथकांच्या माध्यमातून अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रत्येक घरात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात औषध फवारणी सुरु आहे. चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात आलेल्या शाळा आता पडल्यामुळे त्यांना इतर घरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या शिवसेनेच्यावतीने धान्याच्या कीटचे वाटप सुरू आहे. कोरोनाचा काळात अडीच ते तीन हजार कुटुंबांना व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 3 हजार लोकांना पक्षाकडून धान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. पक्षाच्यावतीने 2400 पत्रे, मेणबत्त्या, मच्छर अगरबत्तीही ग्रामस्थांना वाटण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्यावतीने ग्रामपंचायतींना कायमस्वरूपी कटर दिले आहेत. तसेच पडलेल्या प्रत्येक झाडाचा पंचनामा होऊन प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्यांनी ती मान्य केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, शासनाने एलईडी फिशिंग करणाऱयांना यापुढे 5 लाखाचा दंड व्हावा व सर्वच नुकसानीबाबत अडीच पट मदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या चक्रीवादळात पर्यटन विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे रिसॉर्ट व हॉटेल, घरगुती राहण्याची सोय उद्ध्वस्त झाली आहे. यासाठी आपण शासनाकडे वेगळे पॅकेजचा पाठपुरावा करत आहोत. नुकसानग्रस्त शाळांचे पंचनामे लवकरात-लवकर पूर्ण करून त्या देखील उभारण्याची हमी सरकारने घेतली आहे. दापोली तालुक्यात काही गावांमध्ये पंचनाम्यात गडबड झालेली असल्यास तेथे फेरपंचनामे करण्यात येतील, कुणावरही अन्याय होणार नाही, अशी हमीही त्यांनी यावेळी बोलताना दिली