समुद्र बनलाय एलईडी बल्ब सँक्च्युरी! : मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांची मत्स्य विभागावर टीका
प्रतिनिधी / मालवण:
सध्या समुद्र किनारी वाहून येत असलेले प्रखर प्रकाश देणारे एलईडी बल्ब जर समुद्री ‘कचरा’ असतील, तर हा सागरी जीवांना विघातक असलेला कचरा वाढविण्यास मत्स्य विभागच जबाबदार आहे. शासनाला सागरी अभयारण्य साकारण्याची घाई लागलीय. अभयारण्य होईल की नाही माहिती नाही. परंतु केंद्र व राज्य शासन बेकायदेशीररित्या होणारी एलईडी मासेमारी रोखू शकत नसल्याने समुद्र मात्र ‘एलईडी बल्ब सँक्च्युरी’ बनलाय एवढे नक्की, अशा शब्दांत मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागावर नाराजी व्यक्त केली आहे.
पराडकर म्हणाले, मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांचे वक्तव्य बेजबाबदार आणि दुर्दैवी आहे. भारत सरकार स्वच्छ भारतसाठी आज अनेक उपक्रम राबवित आहे. त्यामुळे ‘एलईडी बल्बचा समुद्री कचरा आम्ही गोळा करीत बसायचे का?’ अशी भाषा मुळात एखाद्या शासकीय अधिकाऱयास शोभत नाही. मत्स्य अधिकाऱयांच्या मते जर एलईडी बल्ब हा समुद्री कचरा असेल, तर हा कचरा वाढण्यास कारणीभूत कोण आहे, या गोष्टीचे आत्मचिंतन सर्वप्रथम मत्स्य विभागाने केले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाने आपापल्या सागरी हद्दीत एलईडी मासेमारीस बंदी घातली आहे. परंतु ही बंदी झुगारून बेकायदेशीररित्या एलईडी दिव्यांच्या सहाय्याने एलईडी मासेमारी केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारची कुठलीही यंत्रणा समुद्रात लखलखाट निर्माण करणाऱया अशा नौकांना रोखू शकत नाही, याचेच दु:ख आहे. किनाऱयावर वाहून येणारे एलईडी बल्ब कदाचित बंद पडलेले असावेत. ते निकामी झाल्याने वापरकर्त्यांनी ते समुद्रात कचरा म्हणून फेकून दिले असण्याची शक्यता आहे. समुद्राला कचराकुंडी बनविण्याचा अधिकार एलईडीवाल्यांना कुणी दिलाय, याचे उत्तर मत्स्य विभागाने मच्छीमारांना द्यावे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एलईडीवाले आम्ही कुणाला जुमानत नसल्याच्या आविर्भावात वागत आहेत. सागरी पर्यावरणाचेही ते मोठे नुकसान करत आहेत. परंतु स्वच्छ भारत आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी धडपडणारी सरकारी यंत्रणा ही गोष्ट गंभीरपणे घेताना दिसत नाही. एलईडी बल्बचा कचरा मत्स्य विभागाला गोळा करायचा नसल्यास हा कचरा स्थानिक मच्छीमार गोळा करतील. त्याविषयी चिंता नसावी. परंतु एलईडी बल्बचा बेकायदेशीर वापर आणि त्यामुळे निर्माण होणारा विघातक कचरा शासन थांबवणार आहे की नाही हाच प्रश्न असल्याचे पराडकर म्हणतात.
मच्छीमारांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहेत!
मत्स्य व्यवसाय कार्यालय हे मच्छीमारांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहेत. एलईडी मासेमारीला बंदी असताना ती सुरू असल्याबाबत मच्छीमार वारंवार मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही आणि आता एलईडी किनाऱयावर येत असताना त्यांच्याकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. यामुळे आम्हा मच्छीमारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार मत्स्य व्यवसाय विभाग करत आहे. भविष्यात आम्ही याचा जाब मत्स्य व्यवसाय विभागाला विचारू, असा इशारा पराडकर यांनी दिला आहे.