22 जानेवारी रोजी मौनव्रत सोडणार सरस्वती देवी : अयोध्येसाठी रवाना
वृत्तसंस्था/ रांची
अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 जानेवारी रोजी देशवासीयांना दीपप्रज्ज्वलन करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे. आता राम मंदिर उभारणीशी संबंधित अनेक कहाण्या समोर येत आहेत. झारखंडमधील 85 वर्षीय सरस्वती देवी मागील 31 वर्षांपासून मौनव्रत धारण करून आहेत. राम मंदिर उभारणी पूर्ण झाल्यावरच मौन सोडणार असल्याचा प्रण सरस्वती देवी यांनी 1992 मध्ये बाबरी पतनानंतर केला होता. सरस्वती देवी या धनबादच्या रहिवासी असून कुटुंबासोबत राम मंदिराचे उद्घाटन पाहण्यासाठी त्या अयोध्येला रवाना झाल्या आहेत.
अयोध्येत सरस्वती देवी या मौनी माता या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या लोकांशी हातवारे करून संभाषण साधतात. अवघड गोष्ट सांगायची असल्यास त्या लिहून सांगत असतात. 1992-2020 पर्यंत त्या दुपारी एक तास बोलायच्या. परंतु 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यापासून त्या पूर्णपणे मौन राखून असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
जोपर्यंत राम मंदिर उभारणी होत नाही तोवर मौन बाळगणार असल्याचा प्रण सरस्वती देवी यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी केला होता. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यापासून त्या अत्यंत आनंदी असल्याचे त्यांचे पुत्र 55 वर्षीय राम अग्रवाल यांनी सांगितले आहे. सरस्वती देवी या 8 जानेवारी रोजी रात्री धनबाद येथून गंगा-सतलज एक्स्प्रेसद्वारे अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. 22 जानेवारी त्या मौनव्रत सोडणार आहेत. सरस्वती देवी या नेहमीच भगवान रामाच्या आराधनेतच लीन असतात. 2001 मध्ये त्यांनी चित्रकूट येथे 7 महिन्यांपर्यंत तपस्या केली होती असे त्यांच्या कुटुंबीयांचे सांगणे आहे.
स्वातंत्र्यानंतर हिंदूंचा सर्वात मोठा कार्यक्रम
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रसारण न होणारे एकही मोठे गाव नसणार आहे. केवळ हिंदूधर्मीयच नव्हे तर पूर्ण जगाचे लोक रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतीक्षा करत आहेत. लोक आपाआपल्या पद्धतीने राम सेवा करत आहेत असे केंद्रीय मंत्री जी. किशन रे•ाr यांनी सांगितले आहे.
रामलल्लाच्या मिरवणुकीची योजना रद्द
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्या शहरात रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. हा कार्यक्रम 17 जानेवारी रोजी होणार होता. अधिकाधिक भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेत यावे हा यामागचा उद्देश होता. आता रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक मंदिर परिसरातच काढली जाणार आहे. हा निर्णय गर्दीला नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.