ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसून त्यांना परिक्षेविनाच उत्तीर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाईनच झाल्या. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न देखील होता.
- दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच होणार !
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाईन घ्यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.