भारताकडे यजमानपद -अफगाणिस्तानचा मुद्दा असणरा केंद्रस्थानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रिक्सच्या देशांची चालू वर्षातील शिखर परिषद 9 सप्टेंबर रोजी आयोजित होणार आहे. 13 व्या शिखर परिषदेत भारत यंदा व्हर्च्युअली अध्यक्षत्व सांभाळणार आहे. या परिषदेत भारतासह चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका सामील होणार आहे. यंदाच्या परिषदेत सर्व सदस्य देशांचा भर अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर राहणार असल्याचे मानले जात आहे. ब्रिक्स ही संघटना उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील देशांमधील सहकार्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
मागील वर्षी भारत आणि चीन यांच्यात लडाखमधील हिंसक झटापटीमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मागील वर्षी चीनने सीमेवर कित्येकवेळा आगळीक केली होती. पण हा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक बैठका झाल्या असून त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले आहे. ब्रिक्सच्या परिषदेत भारत आणि चीन यांच्यातील वादावर चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. दोघांमधील तणावामुळे ब्रिक्स संघटनेमधील सहकार्य वाढविण्यास अडथळा निर्माण झाला होता. मागील वर्षी रशियाने परिषदेचे आयोजन केले असता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग सामील झाले होते.
मागील महिन्यातच भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार ब्रिक्स प्रतिनिधींच्या बैठकीत सीमापार दहशतवाद आणि लष्कर-ए-तोयबा तसेच जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा मुद्दा उपस्थित केला होता. या दहशतवादी संघटनांना एका देशाचे सर्मान प्राप्त असून शांतता आणि सुरक्षेवरून अन्य देशांना धमकावत असल्याचे भारताने म्हटले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.