लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात शुक्रवारी पहाटे तीन वाजता लखनौमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथील दिलकुशा कॉलनीत भिंत कोसळल्याने 9 जणांचा चिरडून मृत्यू झाला. सर्व मृत आणि जखमी झाशी जिह्यातील पाचवाडा येथील रहिवासी आहेत. दोन जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी सांगितले.
झाशी येथील काही मजूर कुटुंबीय कॅन्टोनमेंट परिसरातील आर्मी कॅम्पसच्या जुन्या भिंतीलगत एका झोपडीत राहत होते. येथेच नवीन सीमा भिंत बांधण्याचे काम करत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झोपडीलगतची भिंत कोसळून 9 जणांना प्राण गमवावे लागले. दुर्घटनेवेळी झोपडीत लोक झोपले होते, अशी माहिती प्राथमिक तपासाअंती प्रशासनाकडून देण्यात आली.