लडाखमधील प्रतिकूल हवामानाचा परिणाम
लडाख / वृत्तसंस्था
लडाखच्या सीमेवर भारत आणि चीन यांचे सैनिक आजही काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे असल्याची स्थिती आहे. तेथील हवामान अत्यंत प्रतिकूल असल्याने चीनने आपले 90 टक्के सैनिक मागे हटवून त्याजागी नवे सैनिक नियुक्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लडाखमधील अतिथंड व कोरडय़ा हवामानाची सवय चिनी सैनिकांना नाही. त्यामुळे तेथे अधिक काळ राहिल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. अशा स्थितीत संघर्षाचा प्रसंग उद्भवल्यास हे सैनिक अकार्यक्षम ठरतील अशी चिंता चीनला वाटते. त्यामुळे तो देश आपल्या सैनिकांची झटपट अदला-बदली करीत आहे, असे दिसून आल्याची माहिती देण्यात आली. चीनने भारतीय नियंत्रण रेषेच्या जवळ साधारणतः 50 हजार सैनिकांना आणले आहे. भारतानेही प्रत्युत्तरादाखल आणि आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी तेवढेच सैनिक नियुक्त केले आहेत.
अद्यापही तणाव
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चीनने भारताच्या सीमारेषेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्ष उद्भवला होता. त्याचेच पर्यवसान 20 जूनच्या मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी होण्यात झाले होते. या संघर्षात भारताचे 20 ते चीनचे 45 हून अधिक सैनिक मारले गेले होते. चीनने अनेक महिन्यांनंतर आपलेही सैनिक मारले गेल्याची क बुली दिली होती, मात्र आपले कमी सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता. तथापि, अनेक विदेशी पत्रकारांच्या निष्कर्षानुसार चीनला मोठी मनुष्यहानी सोसावी लागली होती.
भारताची नियुक्ती दोन वर्षांसाठी
लडाखमध्ये भारत आपल्या सैनिकांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करतो. यातील 40 ते 50 टक्के सैनिक एक वर्षानंतर बदलले जातात. तर या दुर्गम भागात कार्यरत असलेल्या इंडो-तिबेटियन सैनिकांची नियुक्ती तर दोन वर्षांहूनही बऱयाच अधिक काळासाठी केली जाते. भारतीय सैनिकांना या वातावरणाची सवय चिनी सैनिकांपेक्षा अधिक चांगली आहे, असे तज्ञांचे मत आहे.