सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
शेतकऱयांना स्वावलंबी बनविण्यासाठी भाजप सरकार अनेक योजना आखत आहे. सर्व शेतकऱयांना कर्जाची सुविधा मिळावी यादृष्टीने चालू वर्षात 30,85,644 शेतकऱयांना 20,810 कोटी रुपये कृषी कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार यापूर्वीच 12,35,033 शेतकऱयांना 9,136.89 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली. याबाबत त्यांनी रविवारी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
मंत्री सोमशेखर पुढे म्हणाले, शेतकऱयांना कोणत्याच पद्धतीच्या समस्या होऊ न देता त्यांची काळजी घेणे आमचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी देखील शेतकऱयांना कोणत्याही अडचणीशिवाय कृषी कर्जाचे वितरण करावे, अशी सूचना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यातच अल्पावधी, दिर्घावधी आणि मध्यमावधी कर्ज वितरणात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. डीसीसी बँकांच्या मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱयांची लवकरच बैठक बोलावून सहकार खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱयांशी आढावा बैठक घेणार आहे. दरम्यान, विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.