एनएसओ अहवाल सादर : दिल्ली दुसऱया स्थानावर : आंध्रप्रदेश 66.4 टक्क्यांसह तळाला, शहरी क्षेत्रात साक्षरता अधिक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (एनएसओ) कडून सादर साक्षरतेवरील एका अहवालात 96.2 टक्के साक्षरतेसह केरळ पुन्हा एकदा देशात सर्वाधिक साक्षर राज्य ठरले आहे. तर आंधप्रदेश 66.4 टक्क्यांच्या दरामुळे सर्वात कमी साक्षरतेचे राज्य राहिले आहे. या अहवालात 7 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील साक्षरतेच्या प्रमाणाचा राज्यनिहाय तपशील देण्यात आला आहे.
अहवालानुसार केरळनंतर दिल्ली दुसऱया स्थानावर आहे. देशाच्या आघाडीच्या साक्षर राज्यांमध्ये उत्तराखंड तिसऱया, हिमाचल प्रदेश चौथ्या आणि आसाम पाचव्या स्थानावर राहिला आहे. दुसरीकडे सर्वात खराब कामगिरी असलेल्या राज्यांमध्ये राजस्थानचा समावेश आहे. तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये साक्षरतेचा दर 73.5 टक्के राहिला आहे. हे प्रमाण शहरी क्षेत्रांच्या (87.7 टक्के) तुलनेत 14.2 टक्क्यांनी कमी आहे.
पुरुषांमध्ये अधिक प्रमाण
याचबरोबर देशात पुन्हा एका महिला आणि पुरुषांच्या साक्षरतेच्या दरात मोठा फरक दिसून आला आहे. अहवालात पुरुष साक्षरता दर 84.7 टक्के आहे. तर महिलांचा साक्षरता दर पुरुषांपेक्षा 14.4 टक्क्यांनी कमी म्हणजेच 70.3 टक्के आहे. सर्वेक्षणात सर्व राज्यांमध्ये पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. साक्षरतेच्या दरात चांगली आणि खराब कामगिरी करणाऱया राज्यांमध्येही हे अंतर आढळून आले आहे.
ग्रामीण अन् शहरी कुटुंबे
एनएसओकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात देशातील 8,097 गावांच्या 64,519 ग्रामीण कुटुंबांना तर 6,188 ब्लॉकांच्या 49,238 शहरी कुटुंबांना सामील करण्यात आले होते. सुमारे 4 टक्के ग्रामीण घरे आणि 23 टक्के शहरी घरांमध्ये संगणक असल्याचे अहवालातून समजते. 1529 वयोगटातील लोकांमध्ये, ग्रामीण क्षेत्रांच्या सुमारे 24 टक्के आणि शहरी क्षेत्रांमध्ये 56 टक्के लोक संगणकाचा वापर करण्यास सक्षम होते.