अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 21 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● किरकोळ लक्षणे, आयसोलेशन 3 दिवस
● 2.85 टक्के रुग्ण दवाखान्यात
● मृत्यू दर 0.18 टक्क्यांच्या खाली
● घरी सोडणारे तुम्ही कोण?
सातारा / प्रतिनिधी :
नव्याने बाधित सापडण्याचा आकडा दीड हजाराच्या पुढे गेला असला तरी सर्वांनाच सौम्य लक्षणे आहेत. कोणीही लोक दवाखान्यांकडे फिरकत नसून घरच्या घरी ठीक होत आहेत, त्यामुळे लादलेले सगळे निर्बंध धुडकावून लोक सामान्य जनजीवन जगत आहेत.
देश, राज्य व सातारा जिल्ह्यात समान स्थिती आहे. महाराष्ट्रासह अन्य 5 राज्यांत तिसरी लाट आल्याचा कांगावा सुरू असला तरी सर्वाधिक केसेस येत असल्येला जिल्ह्यात सातारा जिल्हा आहे. जिल्ह्यात दैनंदिन आकडा दीड हजाराच्या पार गेला असला तरी कुठेही भयावह स्थिती नाही. लोक अनामिक भीतीने गांगरून जात नसल्याची पोटदुखी सत्ताधारी व प्रशासनाला लपवता येत नाहीय. वास्तविक, उपचारार्थ रुग्णसंख्या 8 हजारच्या पुढे असली तरी उपचारार्थ रुग्ण केवळ 2.85 टक्के आहेत. बाकी 97.15 टक्के लोक घरच्या घरी बरे होत आहेत.
घरी सोडणारे तुम्ही कोण?
जर लोक शासनाकडे सोडाच दवाखान्यातही जात नाहीयेत. घरीच राहून बरे होत आहेत तर रोजच्या रोज “अमुक इतक्या लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले” असे शासकीय पातळीवर सांगितले जात आहेत. त्यामुळे जर शासनाच्या दारी कोण गेलेच नाही तर “घरी सोडले” असे सांगणारे तुम्ही कोण? असा संतापजनक सवाल जनतेतून येत आहे.
मृत्यूदर 0.18च्या खाली
सौम्य लक्षणे असल्याने जगात 5 दिवस आयसोलेशन असले तरी महाराष्ट्र सरकारने आयसोलेशनचा काळ 7 दिवसांचा जाहीर केला आहे. मात्र, ना कंटेन्मेंट झोन, ना घरावर फलक अश्या स्थितीत बाधित असलेले लोक सहजपणे 2 दिवस पण आयसोलेशन पाळत नाहीयेत किंवा कोण बाधित आले म्हणून त्यांना कुटुंबीय किंवा पै-पाहुणे, मित्र हे लांब ठेवत नाहीयेत….. त्यामुळे जरी कोण बाधित आले तरी त्यांना त्याची तसूभर ही भीती उरलेली नाही. त्यामुळेच लाटाप्रिय शासन व प्रशासन यांना लोकांचे निडर वागणे असह्य होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने उत्साही वातवरण आहे. शिक्षकांनी आता आपला गणवेश धुवून इस्त्री-बिस्त्री करायला सुरुवात केली आहे.
opd हाऊसफुल्ल, ipd ला केवळ प्रतीक्षा
सौम्य लक्षणांमुळे केवळ opd हाऊसफुल्ल आहेत. त्यातही लोक फॅमिली डॉक्टरकडे गेले तर ‘टेस्ट करूच नका’ असा खरा आणि चांगला सल्ला दिला जात आहे. बड्या दवाखान्यातल्या डॉक्टरला ड्युटी लवकर मिळत नसल्याने अनेक हॉस्पिटल प्रशासन प्रतिक्षेत आहेत.
शुक्रवारी जिल्हय़ात
नमुने-5,104
बाधित-1652
मृत्यू-03, उशिरा नोंद -00
उपचारार्थ-8757
मुक्त-973
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-24,50,130
बाधित-2,64,183
मृत्यू-6,520
मुक्त-2,49,015