राजकारणात भ्रष्टाचाराला स्थान नाही : सचिन पायलट
दौसा येथे बोलताना स्वपक्षीयच लक्ष्य :
वृत्तसंस्था/ दौसा
काँग्रेसचे दिग्गज नेते राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजस्थानच्या दौसा येथे जात त्यांचे पुत्र सचिन पायलट यांनी समर्थकांना संबोधित केले आहे. माझ्यावरील जनतेचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. राजकारणात स्वत:चे म्हणणे मांडणे अत्यंत आवश्यक आहे. हे म्हणणे मांडण्यासाठी मी जनतेचा आवाज ऐकतो. जनता अन् माझ्या अंतरात्म्याचा आवाज एकच असतो. राजकारणात भ्रष्टाचाराला स्थान नाही असे उद्गार सचिन पायलट यांनी रविवारी काढले आहेत. दौसा येथे त्यांनी राजेश पायलट यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे.
राजकारणात भ्रष्टाचाराला कुठलेच स्थान मिळू नये. नेत्याने प्रतिकूल स्थितीतही सत्य बोलायला हवे. आता नाही तर उद्या न्याय हा मिळणारच. राजकारणात राजेश पायलट यांनी नेहमीच स्वत:चे म्हणणे जोरदारपणे मांडले. त्यांनी कधीच सत्तेसाठी तडजोड केली नाही. 23 वर्षांपूर्वी राजेश पायलट यांचे एका रस्ते दुर्घटनेत निधन झाले. त्यांची कमतरता पूर्ण क्षेत्रातील जनतेला जाणवते. राजेश पायलट यांच्या निधनानंतर राजकारणात उतरल्यावर मी कधीच स्वाभिमान अन् विचारसरणीशी तडजोड केली नाही. स्वत:च्या राजकारणाद्वारे एक उदाहरण प्रस्थापित केल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे.
20-22 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मी नेहमीच तरुणाईचे मुद्दे मांडले आहेत. जनतेचा माझ्यावरील विश्वास कमी होईल असे कुठलेच कृत्य माझ्या हातून घडू दिलेले नाही असे वक्तव्य पायलट यांनी केले आहे.
गरीबांना मदत करण्याचा मुद्दा येताच केंद्र सरकार मदत केल्याने आर्थिक दिवाळखोरी येईल असे म्हणू लागते. परंतु मी नेहमीच गरीब आणि तरुणाईची मदत करण्याबाबत बोलत असतो. खऱ्या मनाने गरीब, तरुणाईची मदत करण्यासाठी मोठे मन असायला हवे. वसुंधरा राजे यांचे सरकार अत्यंत शक्तिशाली होते, परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना जनतेच्या पाठिंब्याद्वारे मी या सरकारला जेरीस आणले हेते. मी आवाज उठविल्यानेच राजे सरकारला खाणवाटप रद्द करावे लागले होते. प्रत्येक चुकीला शिक्षा ही व्हायलाच हवी, असे पायलट यांनी म्हटले आहे.