ऑगस्टमध्ये खेळणार तीन सामन्यांची टी-20 मालिका
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया ऑगस्टमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. हे तीनही सामने आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिनपासून थोड्या अंतरावर असलेल्या मालाहाइडमध्ये खेळवले जाणार आहेत. आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ड्यूट्रोम यांनी या मालिकेविषयी माहिती दिली. सोबतच आपल्या व्यस्त वेळापत्रकात देखील आयर्लंड दौरा केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले.
वॉरेन ड्यूट्रोम म्हणाले की, आम्ही वर्षभरात दुसऱ्यांदा टीम इंडियाचे आयर्लंडमध्ये स्वागत करण्यासाठी खुश आहोत. 2022 मध्ये झालेल्या दोन सामन्यांची सर्व तिकिट विकली गेली होती. अशामध्ये यावर्षी होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतून प्रेक्षकांना हा आनंद लुटण्यासाठी अधिक संधी मिळेल. हा क्षण नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आयर्लंडचा समावेश करण्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अनुकूल अशी मालिका आयोजित करण्यासाठी, बीसीसीआयचे धन्यवाद. शुक्रवार आणि रविवारी सामने असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने येऊ शकतात, असेही वॉरेन म्हणाले.
दरम्यान, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. विंडीज दौरा संपल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी टीम इंडिया थेट आयर्लंडसाठी रवाना होणार आहे. आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून मंगळवारी बीसीसीआयने विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. वनडे विश्वचषकात खेळाडूंना लागोपाठ सामने खेळावे लागणार असल्याने आयर्लंड दौऱ्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला सामना – 18 ऑगस्ट
दुसरा सामना – 20 ऑगस्ट
तिसरा सामना – 23 ऑगस्ट