अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, समोर दिसणाऱ्या सर्व सजीव निर्जीव वस्तू ही माझीच निर्मिती असल्याने ते माझ्यापेक्षा वेगळे नसतात. पण लोकांची स्वार्थी वर्तणूक बघितल्यावर उद्धवच्या मनात असे आले की, प्रत्येकजण स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी भल्याबुऱ्या सर्व मार्गांचा अवलंब करत आहे मग हे सर्व ईश्वरस्वरूप कसे म्हणायचे? त्याने ही शंका देवांना विचारली. त्यावर भगवंत हसले आणि म्हणाले उद्धवा, तुझी शंका रास्त आहे. लोकांचे वागणे आणि बोलणे बघितल्यावर हे माझ्यासारखेच आहेत हे खरे कशावरून? असे वाटणे साहजिकच आहे. मुळचे शुद्ध असलेले आत्मतत्व जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा ते निर्गुण, निर्विकार असते. देह हा मायेने तयार होत असल्याने, देहात प्रवेश केल्यावर मायेतील त्रिगुणांनी आत्मतत्व वेढले जाते. मनुष्य लहान असताना म्हणजे बाल्यावस्थेत असताना हे गुण माणसाच्या स्वभावात सारख्याच प्रमाणात असतात. म्हणून लहान मुले निरागस असतात. मनुष्य जसजसा मोठा होतो तसा सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांपैकी ज्या गुणाचे त्याच्यात अधिक्य असेल त्याप्रमाणे त्याचा स्वभाव होतो. म्हणून प्रत्येकाची वागणूक स्वभावानुसार वेगवेगळी होत असते. भगवंत पुढे म्हणाले सत्वगुणाचे प्रमाण अधिक असलेला मनुष्य जागृत असतो तर रजोगुणी स्वत:च्या स्वप्नात वावरत असतो. तमोगुणी झोपेत असल्याने मुर्खासारखा वागत असतो. हे सगळं गुणांचे कमीजास्तपण माणसाच्या कार्यकर्तृत्वामुळे भासत असते. त्यामुळे ज्याप्रमाणे मातीशिवाय घट तयार होऊ शकत नाही, धाग्याशिवाय वस्त्र तयार होत नाही त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जग तयार होऊ शकत नाही. त्यामुळे समोर जे जे दिसतंय ते ते माझेच रूप आहे असं समज. जरी समोर दिसणारी माझी रूपे त्रिगुणयुक्त दिसत असली तरी मी मात्र ह्या त्रिगुणांच्या पलीकडे असतो. ह्या तिन्ही गुणांच्या अवस्थांना, त्यांच्या दृश्य द्रष्टा आणि दर्शन ह्या त्रिपुटीना मी प्रकाशित करणारा असलो तरी मी स्वत: चौथ्या अवस्थेत असतो. त्याला तुरीय अवस्था असे म्हणतात. उद्धव म्हणाला, भगवंता सत्व, रज, तम ह्या गुणांच्या प्रभावाने तयार होणाऱ्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थांची माहिती सर्वांना असते परंतु तुरीय ही चौथी अवस्था कुणी कधी ऐकली नाही. त्यावर भवंत म्हणाले देह आणि प्रपंच नाहीसे झाले आणि भूतांचा भूतात लय झाला की, गुणांच्या तिन्ही अवस्था लय पावतात. असे झाले की, चौथ्या तुरीय अवस्थेचा प्रत्यय येतो. थोडक्यात मनुष्य त्रिगुणांच्या पलीकडे गेला की, त्याला तुरीय ही चौथी अवस्था अनुभवता येते. वेदही ह्याबाबतीत मुग गिळून गप्प बसतात. कारण तुरीय अवस्था ही शब्दांनी समजावून सांगायची गोष्ट नसून ती प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे. त्यासाठी कोणती युक्तीप्रयुक्ती करू म्हणशील किंवा जाणीवेतून तुरीय अवस्था समजाऊन घ्यायचा प्रयत्न करशील तर सर्व खटाटोप वाया जाईल. गुरुकृपेशिवाय तुरीय अवस्था अनुभवता येत नाही. प्रत्येकाच्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थेत माझ्या सत्तेनुसार कार्य चालते. हे कार्य चालण्यासाठी जे चैतन्य लागते ते तुरीय अवस्थेत असलेला मी पुरवत असतो.मी त्यात कोणतीही ढवळाढवळ करत नाही. ही गोष्ट वेदानाही मान्य आहे. मी जर तुरीय अवस्थेतून म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे राहून देहाला चलनवलन करण्यासाठी चैतन्य पुरवले नाही तर चैतन्यहीन देहाला ह्यातली कोणतीच अवस्था जाणवणार नाही. ह्याचा अर्थ असा की तुरीय अवस्थेत असलेल्या माझ्याशिवाय इतर अवस्थेत असलेल्या सजीव, निर्जीव व्यक्ती, वस्तू ह्या केवळ मिथ्या आहेत किंवा निरर्थक असून त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही.