उद्यापासून सुरु होणार मासेमारी हंगाम : परराज्यातील कामगार गोव्याच्या वाटेवर
पणजी : मासेमारी बंदीचा 2 महिन्यांचा कालावधी आज सोमवार 31 जुलै रोजी संपुष्टात येत असून उद्या मंगवार 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगामास सुरूवात होणार आहे. त्यासाठी मच्छीमारांनी आपल्या बोटी व इतर सामग्री सज्य केली असून उद्यापासून मासेमारी चालू करण्याची तयारी केली आहे. 1 जून ते 31 जुलै असा दोन महिन्यांचा मासेमारी बंदीचा काल आज संपला आहे. पाऊस कमी झाला असून हवामान चांगले असल्यास बोटी मासेमारीसाठी समुद्रात जातील, असे सांगण्यात आले. बोटीवर कामास असणारे कामगार अद्याप परतलेले नाहीत. ते आल्याशिवाय काही बोटमालक समुद्रात उतरत नाहीत. काही कामगार परतले असून काही गोव्याच्या वाटेवर आहेत. सर्व कामगार परतण्यासाठी आणखी आठवडाभर तरी लागण्याची शक्यता काही बोटमालकांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू व इतर राज्यातील अनेक कामगार या मासेमारी बोटीवर काम करतात. ते दोन महिन्यांसाठी आपल्या गावात गेले होते. ते आता हळुहळू परततील. मासेमारी करणारे बोटमालक त्या कामगारांवर अवलंबून असून ते आल्याशिवाय मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही. ज्यांच्याकडे पुरेसे कामगार आहेत तेच उद्यापासून समुद्रात उतरण्याचे धाडस करतात. हवामान खराब असल्यास काहीजण मासेमारीसाठी जाण्याचे टाळतात.