आयुष: खण्डमादाय रविरस्तमयं गत: ।
अहन्यहनि बोध्दव्यं किमेतेत् सुकृतं कृतम् ।
आपले आयुष्य दिवसाचा सुर्यास्त झाला की एक दिवसाने कमी होते. हे जाणुन प्रत्येकाने आपण चांगल्या गोष्टिंचा विचार करणे आवश्यक आहे.
जगात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती तर आनंदाने जगण्याची गोष्ट,… स्वामी रामानंद तीर्थ यांनी एका ठिकाणी म्हटलेय……….‘आनंदात जगणं प्रत्येकाचं कर्तव्यच आहे’ हे वाक्य वाचलं आणि लक्षात आलं मी तर आनंदातच आहे की… कारण माझ्याकडे फ्लॅट आहे, गाडी आहे, परदेशी प्रवास मी करते बटन दाबलं की पैसे मिळतात, आणखीन काय लागतं आनंदाला? विचार केल्यावर लक्षात आलं जीवापाड कष्ट करून मी या सगळ्या गोष्टी आनंदासाठी घेतल्या पण आनंदापेक्षा त्या सगळ्या गोष्टी सांभाळतांना मला अनेक ताणच निर्माण झाले आणि अतिशय दु:खद अशा घटना घडत गेल्या म्हणजेच… मी त्रास विकत घेतला आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं होतं. माझा दरवर्षीचा वाढदिवस करताना मी मोठा झालो म्हणून कौतुकाने आम्ही मिरवत असतो, पार्ट्या करत असतो परंतु आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला हे आमच्या लक्षातच येत नाही. सृष्टी निर्माण करताना ईश्वराने सर्वच प्राण्यांना जगण्याच्या आनंदाबद्दल सांगितलं होतं पण माणसाने या जगण्याला आपल्या बुद्धीच्या जोरावर सुखावणे पसंत केले. इतर कर्तव्ये करताना प्रत्येकातून काही ना काहीतरी फायदा किंवा पुण्य होते पण आनंदाच्या कर्तव्याबद्दल आम्हाला फक्त निर्व्याज आनंदच मिळत असल्याने अशी व्यवहारकुशल माणसं आनंदापेक्षा सुखाला प्राधान्य देताना दिसतात. गोड पदार्थ खाल्ला की जिभेला सुख, सिनेमा नाटक पाहिलं की डोळ्यांना सुख, छान संगीत ऐकलं की कानाला सुख, याप्रमाणे इंद्रियांना होणाऱ्या सुखालाच आम्ही सतत मिळवत राहतो. अगदी आयुष्यभर त्याच्यासाठी धडपड करतो, ज्याचा उपयोग खर म्हणजे क्षणभंगुर असतो. कारण ही अशी सुखं आम्हाला वारंवार मिळवायला लागतात. ती परत परत मिळवावी लागतात. पण आनंद मात्र हा आत्मिक असतो. तो निर्माण होतो, अनुभवता येतो आणि चिरकाल टिकतोसुद्धा. फुलपाखराचे आयुष्य दहा-बारा दिवसांचे पण या थोड्या दिवसातही फुलपाखरू आनंदाचीच निर्मिती करतात. काजवे विशिष्ट वेळी आणि विशिष्ट ठिकाणी चमकून जातात पण सूर्यालासुद्धा त्यांचा हेवा वाटतो असं ते जगतात. झाडं, फुलं, पानं, फळं, पक्षी हेदेखील कुठल्यातरी अंतरिक ओढीने जन्माला येतात आणि कोमेजतातसुद्धा. त्याचा खेद नाही की पश्चात्ताप. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ईश्वराने निर्माण केलेल्या जीवसृष्टीत फक्त आनंदाचेच तरंग उमटतात, जे बाबा आमटे यांना कुष्ठरोग्यांमध्ये दिसतात आणि सारा परिसरच आनंदवन करून टाकतात. रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन त्या ठिकाणी अवतरते, आम्ही मात्र घराचे नाव ‘आनंद भुवन’ ठेवतो आणि घरात मात्र सगळ्यांचे चेहरे त्रासलेले, बिघडलेले, अगदी आम्ही एकमेकांचे वैरी आहोत की काय अशा थाटात एकमेकांशी भांडायला, वाद घालायला सतत उभे ठाकलेले असतो. आम्ही मात्र आनंदाच्या पिढीतले सर्वजण आमच्या मुलांना काय देऊ आणि काय नको असं वागतोय! आम्हाला इंग्रजी शाळा, खाऊ, खेळणी, दप्तर पुस्तक हॉटेल सिनेमे जे जे मिळालं नाही ते सगळं आम्ही आमच्या पिढीला, न मागताच आणून ठेवतो किंवा देतो कारण आम्हाला मुलांना सुखात ठेवल्याचा एक मोठेपणा मिळणार असतो. या सगळ्यामुळे आम्ही एखाद्या ऐतखाऊ मुलालाच पोसत असतो. दु:खाला निमंत्रण देत असतो.