राजकीय वर्चस्वाच्या इर्ष्येत सभासदांचे मूळ प्रश्न दूर्लक्षतिच; सभेत निकोप वैचारिक, तात्विक चर्चेचा अभाव
धीरज बरगे कोल्हापूर
मागील काळात गोकुळची सत्ता महाडिक गटाची होती. त्यावेळी विरोधी पाटील गटाकडून गोकुळच्या कारभाराबाबत जे आरोप, प्रश्न उपस्थित केले जात होते. तेच प्रश्न शुक्रवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक गटाकडून उपस्थित केले. जी उत्तरे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी दिली, तशीच उत्तरे आत्ताच्या सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाकडून देण्यात आली. मात्र गोकुळच्या दूध उत्पादकांच्या समस्या आहे तिथेच आहेत. गोकुळ समोरची आव्हाने प्रामाणिकपणे सोडविण्याची जबाबदारी सत्ताधारी-विरोधकांची आहे. थोडक्यात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी एकप्रकारे ‘शिळ्या कडीला ऊत’ या धर्तीवर होते. यापुढील काळात निदान सभेचे स्वरुप बदलावे एकढीच माफक अपेक्षा. जिल्ह्यातील वर्चस्ववादाचे राजकारण यामागे दडले आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.
वासाचे दूध किती निघाले, किती दूध परत केले, मुंबई, पुण्यातील गोकुळचे ठेके कोणाच्या पै-पाहुण्यांना दिले या जुन्याच प्रश्नांवरुन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. सभेमध्ये महाडिक-पाटील गटातील राजकीय इर्ष्येतून झालेल्या गोंधळात सर्वसामान्य सभासद नेहमीप्रमाणे दूर्लक्षितच राहून त्यांचा आवाज दबला गेला. त्यामुळे राजकीय द्वंद्व बाजूला ठेवून आमच्या प्रश्नांवर वैचारिक आणि तात्विक मुद्यांवर निकोप चर्चा कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य दूध उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या सात वर्षांपासून गोंधळातच सुरु आहे. काही सभा तर अवघ्या तीन मिनिटांत गुंडाळल्याचा इतिहास आहे. पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी त्यावेळचे विरोधक सभेत गोंधळ घालायचे. आता पुर्वीचे विरोधक सत्तेत आल्यानंतर पुर्वीचे सत्ताधारी आता विरोधकाच्या भुमिकेत गोंधळ घालत आहेत.
गोकुळमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सभासद हिताचा कारभार करत असल्याचे यापुर्वी आणि आत्ताही सांगितले जात आहे. मात्र वर्षातून एकदाच सर्वसाधारण सभेत सभासदांना त्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची संधी मिळते. मात्र गेल्या सात वर्षात गोकुळची सभा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांभोवतीच फिरत आहे. यामुळे सभास्थळी पुढील बाजूस आपले कार्यकर्ते बसवायचे, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायची असेच चित्र पहायला मिळत आहे. या सर्व गोंधळाच्या चित्रात सर्वसामान्य सभासद मात्र त्यांच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत.
जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा केंद्रबिंदू असणारा गोकुळ आता राजकारण्यांसाठी राजकारण आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. सद्यस्थितीत गोकुळ दूध उत्पादकांचा राहिला नसून दूध संस्थांच्या माध्यमातून राजकीय वर्चस्वासाठी आणि नेत्यांच्या अर्थकारणासाठीच गोकुळचा वापर सुरु असल्याचा आरोपही दूध उत्पादकांमधून होत आहे. गोकुळचे राजकारण सध्या जिल्ह्यातील दोन ताकदवान नेत्यांभोवतीच फिरत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत या दोन नेत्यांचाच जयघोष सुरु असतो. त्यामुळे हि सभा देखील दोन नेत्यांसाठीच असते का? असा प्रश्न सभासदांमधून उपस्थित होत आहे. सभेतही नेहमीप्रमाणे यंदाही विरोधकांनी उपसिथत केलेल्या प्रश्नांना सोयीस्कर उत्तरे देण्यात आली.
गोकुळसमोर अमुलचे आव्हान
कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असणाऱ्या गोकुळसमोर सद्यस्थितीत अमुलचे आव्हान निर्माण झाले आहे. संघात सुरु असलेल्या राजकारणामुळे वर्षानुवर्षे गोकुळसोबत असणाऱ्या दूध संस्था आज दूरावत आहेत. याचा परिणाम गोकुळच्या दूध संकलनावर झाला आहे हे वास्तव आहे. त्यामुळे गोकुळमधील राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्यातून दूध संकलन वाढीसाठी सत्ताधारी, विरोधक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.