बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिकपणा ठेवावा. सरकारी काम जनतेचे काम आहे, यासाठी तत्पर सेवा देऊन सरकारचे नाव उज्वल करावे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूर येथील कर्नाटक रस्ते सेवा विकास (केआरडीसीएल) निगममध्ये विविध कारणांनी रिक्त झालेल्या पदांवर अनुकंपा आधारावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना हक्कपत्रे देऊन ते बोलत होते. ते म्हणाले, सरकारी सेवेत नव्याने रुजू होणाऱ्यांनी आपल्या सेवा काळात नागरिकांना उत्तम सेवा द्यावी, आपल्या खात्याला नाव मिळवून द्यावे, सरकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्या दृष्टीने काम करून दाखवावे, असे त्यांनी सांगितले. या निगममध्ये कार्यरत असलेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता. या पदांवर अनुकंपाच्या आधारावर 22 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या मुलांना बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते हक्कपत्र वितरण करण्यात आले. उर्वरित प्रकरणे लवकरच निकालात काढण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यदर्शी डॉ. सेल्वकुमार, मुख्य अभियंता दुर्गाप्पा, उपमुख्य अभियंता कृष्णा अग्निहोत्री, मंत्र्यांचे विशेष अधिकारी व्ही. एन. पाटील आदी उपस्थित होते.