ओडीशातील पुरी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथाचा अपमान केला आहे. त्यांच्या या प्रमादासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसची ही मागणी पात्रा यांनी चुकून केलेल्या एका विधानासंबंधी आहे.
‘भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदी यांचे भक्त आहेत’, असे विधान पात्रा यांनी जिव्हाप्रमादामुळे केले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळ माजला आहे. वास्तविक पात्रा यांना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान जगन्नाथाचे भक्त आहेत’ असे म्हणावयाचे होते. असे स्पष्टीकरण त्यांनीच नंतर दिले आहे. त्यांचे विधान आता निवडणुकीच्या काळात महत्वाचे बनले असून काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले आहे. पात्रा यांनी भगवान जगन्नाथाला अवमानित केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
स्वत:ला शिक्षा करुन घेणार
पात्रा यांनी स्वत:च्या चुकून केलेल्या विधानासंबंधी साऱ्या देशाची आणि विशेषत्वाने भगवान जगन्नाथाच्या भक्तांची क्षमायाचना केली आहे. विधान चुकून केले असले तरी त्याचे प्राय:श्चित्त करण्यासाठी 3 दिवस उपोषण करणार आहोत, अशीही घोषणा त्यांनी केली.