हल्ली सारखी चिडचिड होते. खूप अस्वस्थ वाटतं, कामाचा ताण जाणवतो. कशा कशातच लक्ष लागत नाही. विचार तर थांबतच नाहीत. आत्मविश्वास कमीच झालाय. काही सुचत नाही. सगळे म्हणतात झालंय काय तुला? सगळी सुखं दाराशी हात जोडून तर उभी आहेत. सुख बोचतं का? सगळ्यांसाठी आजवर खूप केले. कुणाची आजारपणं काढली, दुखलं खूपलं पाहिलं, यांची मन डळमळली तेव्हा मीच सावरलं..माझ्या आवडी निवडी बाजूला सारल्या. त्यांच्या सुखात सुख मानत जगले. पण आज..आज मला काहीतरी होते आहे म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे कसेनुसे..मॅडम, या नीलाला काळजी म्हणून ती घेऊन आली. मी खरंच अशी नव्हते हो..असं म्हणत मग कितीतरी वेळ भावनांना वाट मोकळी करुन देणारे हुंदके कानावर पडत राहिले.
ताण-तणावाखाली असलेली अनेक माणसे भेटत असतात. एकंदरच मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न आज आपण पहातच आहोत. त्यात स्त्राrयांचे मानसिक आरोग्य, ताणतणाव या संदर्भातील समस्यांचा चढता आलेख चिंताजनक आहे. खरंतर मानसिक समस्या वा प्रश्न एका रात्रीत उद्भवत नाहीत. अनुभव असा आहे की अगदी सुशिक्षित बहुतांश स्त्रियांच्या बाबतीतही हे पहायला मिळते की, जेव्हा स्वत:मध्ये काही शारीरिक वा मानसिक अशा दोन्ही पातळीवर बदल जाणवू लागतात तेव्हा अगदी सुरवातीलाच कुणाची तरी याबाबत मदत घ्यावी असे त्यांना स्वत:लाही वाटत नाही. घरच्यांच्या या गोष्टी लक्षात येऊन त्यांनी त्याची दखल घेतली हे चित्र तर फारच दुर्मिळ.
मुळातच बहुतांश स्त्राrयांच्याबाबतीत हेच चित्र पहायला मिळतं की, जोवर शारीरिक वा मानसिक समस्या त्रस्त करायला लागत नाही तोवर त्याकडे लक्ष दिले जात नाही. कारण आधी नवरा, मुले, घरची सर्व मंडळी आणि सगळ्यात शेवटी अगदी अतिरेक झाला तर आपण हा क्रम वर्षानुवर्ष तिच्या डोक्यात फिट्ट बसलेला असतो. आज्जी, आई, बहिण, मावशी यांचे वर्तन, अशाच पद्धतीने झालेले वर्षानुवर्षांचं ब्रेन प्रोग्रॅमिंग तिलाही त्याच मार्गावर चालायला प्रवृत्त करतं. परंतु हे प्रोग्रॅमिंग आपले आपणच निर्धाराने बदलायला हवे. कुणीतरी माझी दखल घेईल ही वाट पहात राहण्यापेक्षा आपणच आपल्या शारिरिक मानसिक आरोग्याबाबत, ताणतणावाबाबत सजग असणे हितावह ठरेल
आजही बहुतांश ठिकाणी हेच चित्र पहायला मिळतं की, वेळच्या वेळी डबे करणारी, स्वयंपाक, घरच्यांच्या आवडी निवडी सतत जपणारी, घरदार टापटीप ठेवणारी, कायम हसतमुख, सर्वांच्या सेवेसी हजर असं स्त्राrचं व्यक्तिमत्व म्हणजे आदर्श सून, पत्नी, माता वगैरे मनावर पक्के कोरले गेले आहे. ती कितीही शिकली, स्त्राr स्वातंत्र्य, स्त्राr मुक्ती याच्या कितीही गप्पा मारल्या तरी विशिष्ट चौकटीत राहून सगळ्याचा विचार तिला करावा लागतो हे वास्तव आहे. संसाराच्या रामरगाड्यात स्वत:च्या अनेक छंदांना, आवडींना मूठमाती दिली जाते, असंख्य वेळा मन मारत जगलं जातं. मग ते मन मारत जगणं, ती घुसमट त्यातून निर्माण झालेल्या विघातक भावनांची वाफ मनाच्या कोपऱ्यात इतकी साठत जाते की एक दिवस त्याचा स्फोट व्हावा असेच काहीसे घडते. तिचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही धोक्यात येते.
स्त्रियांमध्ये अनेक टप्प्यावर होणारे संप्रेरकातील बदल, दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना करावा लागणारा ताणाचा सामना, अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तर्तेसाठी तिला करावी लागणारी कसरत, घर नोकरी ही डबल ड्युटी करताना येणारा ताण या आणि अशा विविध गोष्टी तिचे मानसिक आरोग्य धोक्यात आणण्यास हातभार लावतात.
खरंतर आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘ताण’ हा शब्द परवलीचा झाला आहे. अगदी सावलीसारखा तो सर्वांच्या सोबत असतो. ताण ही एकप्रकारची असुखकारक भावना आहे. दडपणाची जाणीव देणारी. शारिरीक मानसिक थकवा आणणारी. ताण ही एक अवस्था आहे. मात्र ताणाची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी जर जास्त असेल तर ते रोगाला आमंत्रण ठरु शकतं. ताणामुळे विघातक भावनांना खतपाणी मिळते आणि मानसिक अनारोग्याकडे वाटचाल होऊ लागते.
खरंतर केवळ स्त्राrयांनीच नव्हे तर प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्याबाबत सजग असणे गरजेचे आहे
आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी आत्मसन्मान अर्थात सेल्फ-एस्टीम बाबत ही सजग रहायला हवे. सेल्फ एस्टीम म्हणजेच आपली मूल्ये ठरविणे, आपल्यातील गुण क्षमता ओळखून त्या विकसीत करण्यासाठी जागरुक असणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला जाणवणारा ताण, विविध भावना याकडे आपले लक्ष आहे का? हेही तपासायला हवे. ताणा प्रमाणेच स्वत:च्या त्रासदायक भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी कमी करता येणे हे एक कौशल्य आहे. ‘भावनिक मोजपट्टी’ या सोप्या तंत्राद्वारे आपण स्वत: त्याचे मोजमाप करु शकतो. ही मोजपट्टी खालील प्रमाणे करता येईल.
अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात बॅलन्स म्हणजे समतोल स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकांची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करुन रोज मनात डोकावून पहायचे ..आता कसे वाटते आहे? हा प्रश्न दिवसातून दोन तीन वेळा तरी स्वत:ला विचारायचा. भावनिक मोजपट्टीद्वारे त्याची नोंद करायची. आपली तुलना आपल्यासोबतच करायची.
कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पहाता -1 ,-2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. माझी मुले बाहेर शिक्षण घेत आहेत त्यांची वाटणारी काळजी ही स्वाभाविक आहे. ती नीट रहातील ना? त्यांचे मित्र मैत्रिणी व्यवस्थीत असतील ना वगैरे विचार मनात येतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत..ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना? याकडे लक्ष हवे. म्हणजे सतत हाच विचार मनात घर करु लागला. अस्वस्थता वाटू लागली, त्याचे चिंतेत रुपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, विचारांची दिशा बदलणे आवश्यक आहे. हे बदलायला हवे ही जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासिन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल. म्हणजेच ज्यावेळी कमी अस्वस्थता असेल त्यावेळी वजा तीन, वजा दोन, वजा एक अशी नोंद करायची. ही नोंद व्यक्तीसापेक्ष असते. याबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण सतत अधिक बाजूला असू तर भावनांची सजगता कमी आहे. कारण उदासी येणे हे नैसर्गिक आहे. वजा दोन ते अधिक पाच यामध्ये असणे भावनिक आरोग्याचे लक्षण आहे परंतु सतत वजा या पट्टीवर असणे हे अनारोग्याचे लक्षण आहे. ज्यावेळी आपण अशी भावनांची नोंद करायला शिकतो. आपल्या भावनिक स्थितीला क्रमांक देतो तेव्हा त्या भावनांच्या प्रवाहातून आपण स्वत:ला वेगळे करतो. त्यावेळी वैचारिक मेंदू सक्रिय होतो. भावनिक बुध्दी विकसित होते. मेंदूतील मनाचा ब्रेक हे इनबिल्ट फंक्शन अॅक्टीव्ह झाल्याने भावनेच्या भरात घडणाऱ्या कृतींनाही थांबवता येण्याच्या दिशेने प्रवास सुरु होतो. परंतु हे होण्यासाठी सजगतेने मनात डोकाऊन पाहणे गरजेचे हे मात्र खरे.
अॅड.सुमेधा संजीव देसाई