लोकसभा निकालादिवशीची पडझड काढली भरुन
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात मागील काही दिवसांपासून लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दबावामुळे शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात 4,390 अंकांच्या पडझडीची नोंद करण्यात आली होती. यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 31 लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही चित्र होते. परंतु निकालाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत सेन्सेक्सने 2300 अंकांवर मजल मारली आहे.
बुधवारी शेअर बाजारात मात्र मंगळवारी निर्माण झालेल्या वातावरणात सुधारणा झाल्याचे पहावयास मिळाले. यात दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 2303.19 अंकांनी वधारुन निर्देशांक 74,382.24 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 3.36 टक्क्यांच्या तेजीसह 735.85 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 22,620.35 वर बंद झाला आहे.
लोकसभा निकाला दिवशी झालेल्या विक्रीमुळे बाजारात निर्माण झालेली 2004 च्या दरम्यान झाली होती, तशीच काहीशी स्थिती 4 जून 2024 रोजी झाली होती. मात्र बाजारात ही स्थिती सुधारत गेल्याचे बुधवारी दिसले. यामुळे भारतीय बाजाराने पुन्हा आपली नव्याने दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये सर्व कंपन्यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. यामध्ये बुधवारी 7.75 टक्क्यांनी वधारत इंडसइंड बँकेचे समभाग हे अव्वल स्थानी राहिले. तर अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत होते. निफ्टीमधील कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स हे 7.29 टक्क्यांनी मजबूत राहिले. तसेच इंडसइंड बँक, हिंडाल्को, टाटा स्टील आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा वधारले होते. अन्य कंपन्यांमध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे 0.10 टक्क्यांनी प्रभावीत झाले. तर बीपीसीएलचे समभागही 0.03 टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते.