गटारींअभावी पावसाचे पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान : प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे लघुउद्योजक अडचणीत
बेळगाव : उद्यमबाग येथे अशास्त्राrय पद्धतीने करण्यात आलेले रस्ते व गटारींचे नियोजन नसल्याने पावसाचे पाणी कारखान्यांमध्ये शिरून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यावर्षी पहिल्याच पावसात कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने दोन ते तीन दिवस कारखाने बंद ठेवावे लागले. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. उद्यमबाग गणपती मंदिर परिसरात मागील अनेक वर्षांपासून लहान-मोठे उद्योग कार्यरत आहेत. पूर्वी रस्त्यांची उंची कमी असल्याने त्यामानाने कारखाने उभारण्यात आले होते. परंतु, वर्षभरापूर्वी अंतर्गत रस्ते करण्यात आले. त्यावेळी रस्त्यांची उंची दोन ते तीन फुटांनी वाढविण्यात आली. परिणामी मागील महिनाभरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाचे पाणी शिरून कारखान्यांचे नुकसान झाले.
उद्योजकांना मनस्ताप
अद्याप मान्सूनला सुरुवात नसतानाही उद्योजकांना इतका मनस्ताप सहन करावा लागत असताना मान्सूनच्या काळात काय परिस्थिती उद्भवेल, याची शाश्वती नाही. गटारींचे नियोजन, थांबलेले सीडीवर्क यामुळे गटारींमध्ये जाणारे पाणी आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये शिरत आहे. लाखो रुपये खर्च करून मशिनरी वर्कशॉपमध्ये आणल्या जातात. परंतु, पावसाचे पाणी शिरल्याने या मशिनरींचे नुकसान होत आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात.
आठ ते नऊ कारखान्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान
लघुउद्योगांना उच्च विद्युतपुरवठ्याच्या वाहिन्या जोडलेल्या असतात. तसेच मशिनरीसाठी अंतर्गत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी शिरल्याने काम करताना विजेचाही धोका निर्माण होत आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील अद्याप याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आधीच या ना त्या कारणाने अडचणीत असणारे लघुउद्योग आता या पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा अडचणीत सापडले आहेत.गणपती मंदिर परिसरातील आठ ते नऊ कारखान्यांमध्ये अशाप्रकारे पाणी शिरून नुकसान होत असल्याची तक्रार लघुउद्योजकांनी केली आहे.