मुख्य जिल्हासत्र न्यायाधीश विजयालक्ष्मीदेवी : भविष्यात संकटांना टाळता येणे शक्य
बेळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानात वाढ होत चालली आहे. याला कारण म्हणजे वृक्षतोड आहे. जागतिक तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्षलागवड करणे महत्त्वाचे असून सर्वांनीच याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा, भविष्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल, असे मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी सांगितले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार आणि बेळगाव वनविभाग यांच्यावतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच काही जणांना झाडांचे वितरणही करण्यात आले. देशामध्ये 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जागतिक संघटनेने 1987 पासून हा दिन साजरा करण्यास सुरुवात केल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली. झाडे लावणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर त्यांचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. अन्यथा, केवळ वृक्षारोपण करायचे आणि त्यानंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष करायचे, हे योग्य नाही. तेव्हा झाडे लावा आणि त्यांचे संरक्षण करा, असा संदेशही न्यायाधीशांनी दिला. यावेळी बेळगाव विभागाचे साहाय्यक वनरक्षक अधिकारी शिवरुद्राप्पा कबाडगी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांच्यासह इतर न्यायाधीश व वकील उपस्थित होते.