अधिकारी-कर्मचारी रुजू होण्याची शक्यता
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली होती. मात्र, आता मतमोजणी पूर्ण झाली असून लवकरच पुन्हा हे अधिकारी रुजू होणार आहेत. त्यानंतरच महानगरपालिकेतील कामकाजाला गती येणार आहे. महानगरपालिकेतील आयुक्त,महसूल उपायुक्त यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्या आदेशानुसारच ते रुजू होणार आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या होणार असून त्यांनी म्हणावे तसे कामाकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. याचा कामकाजावर बराच परिणाम झाला आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. त्यानंतर बुधवारी मनपातील विविध कर्मचारी कामावर रुजू होऊन त्यांनी दैनंदिन कामाला सुरुवात केली आहे. मात्र, नवीन कोणत्याच कामाचा शुभारंभ किंवा कामाची गती वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नियमित कामे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सभागृहही अस्तित्वात नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. आता आचारसंहिता संपणार असल्यामुळे सभागृह पुन्हा अस्तित्वात येणार आहे. याचबरोबर अधिकारीही रुजू होणार आहेत. त्यानंतरच कामाची गती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.