नागरिकांमधून तीव्र संताप , राजकीय वरदहस्त असल्याचा संशय, प्रसंगी प्रखर आंदोलन छेडण्याचा निर्धार
पणजी : स्थानिकांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात चाललेल्या तमनार प्रकल्पाच्या कामाबद्दल डिचोली तालुक्यातील आमोणे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकल्प प्रवर्तकांकडून ज्या प्रकारे हटवादीपणे काम सुरू आहे ते पाहता त्यांना मोठ्या राजकीय शक्तीचा वरदहस्त असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. अन्यथा राजकीय आशीर्वादाशिवाय असे काम होणे शक्यच नसल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 400 केव्हीए क्षमतेच्या वीज वाहिन्या ओढल्या जाणार असून त्यासाठी सुमारे 500 कल्पवृक्ष तसेच शेकडो काजूची झाडेही कापण्यात येणार आहेत. त्यामुळे बागायतीही नष्ट होणार असल्याचा दावा स्थानिक करत आहेत. हे सर्व पाहता आधी अनेकांच्या शेतजमिनी नष्ट झाल्या, आता बागायतीही नष्ट होणार आहेत, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ग्रामसभेतूनही विरोधाचे ठराव तरीही…
या प्रकल्पाला केवळ जमीनदारच विरोध करत आहेत, असा प्रश्न नसून स्थानिक ग्रामसभेतूनही विरोधाचे ठराव मंजूर झाले आहेत. गत दोन वर्षांपासून या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आंदोलने करत आहेत.
निवडणूक काळात थंडावलेली कामे नव्या जोमाने प्रारंभ
यासंबंधी यापूर्वी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर केलेली आहेत. त्यानंतर काही काळ वीज वाहिन्या ओढण्याची कामे थंडावली होती. आता लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सदर कामे पुन्हा नव्या जोमाने प्रारंभ झाली आहेत. एवढेच नव्हे तर लोकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन चक्क पोलीस बंदोबस्तात ही कामे सुरू झाली आहेत. यावरून राजकीय आशीर्वादानेच सदर काम होत असल्याबद्दल लोकांची खात्री पटली आहे.अशाप्रकारे शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून प्रसंगी आंदोलन छेडण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले आहेत, अशी माहिती या प्रकल्पाचा फटका बसलेले एक शेकतरी मिलिंद गावस यांनी दिली आहे.