दोन पदे मंजूर असूनही भरती नाही, रुग्णांची गैरसोय
बेळगाव : ईएसआय कामगारांसाठी असणाऱ्या येथील ईएसआय रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशामध्येच सरकारकडून सुविधा दिल्या जात असल्या तरी त्यासाठी मनुष्यबळ नसल्या कारणाने सुविधा असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयासाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे. मात्र,चालकाअभावी रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून पडून आहे. ईएसआय नोंदणीकृत कामगारांसाठी ईएसआय रुग्णालयाची सोय आहे. मात्र, या रुग्णालयामध्ये तज्ञ वैद्य नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे पाठवून दिले जात आहे. रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने रुग्णांना त्याठिकाणी 24 तास सेवा दिली जात नाही. केवळ दिवसभरात सेवा दिली जाते. तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.अशातच सरकारकडून रुग्णांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक सोयीनीयुक्त असणारी रुग्णवाहिका मंजूर करून देण्यात आली आहे. मात्र, ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी चालक नसल्याने गैरसोय झाली आहे.
तज्ञ डॉक्टर नसल्याने गैरसोय
तज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक वर्षांपासूनची गैरसोय आहे. यातच रुग्णालयातील रुग्णवाहिका चालविण्यासाठी दोन चालकांची पदे मंजूर असूनही ती भरून घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिका मिळूनही अनेक दिवसांपासून पडून आहे. शासनाकडून किमान कंत्राटी चालकांची नेमणूक करून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.