सातत्य असणे गरजेचे : इतर ठिकाणीही औषध फवारणी करा
बेळगाव : पावसाला सुरुवात झाल्याने साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्यावतीने औषध फवारणीला सुरुवात झाली आहे. आदर्शनगर, हिंदवाडी येथे औषध फवारणी करण्यात आली. वारंवार अशा पद्धतीने फवारणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून साथीचे आजार डोके वर काढणार नाहीत.सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार बळावत आहेत. त्यामुळे सर्वत्र फवारणी करणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी गटारींमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याला निर्बंध घालण्यासाठी फवारणीची नितांत गरज होती.
महानगरपालिकेच्यावतीने ही फवारणी करण्यात आली आहे. हिंदवाडी परिसरात फवारणी सुरू असली तरी खासबाग, वडगाव, आनंदनगर परिसरातही तातडीने औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर येथे औषध फवारणीची गरज आठ दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ड्रेनेजचे पाणीही काही ठिकाणी रस्त्यांवरूनच वाहत होते. गटारींमध्ये कचरा अडकल्याने गटारींचे पाणी जवळ असलेल्या खुल्या जागांमध्ये तसेच रस्त्यांवरून वाहत होते. येळ्ळूर रोडवरील आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर येथे ड्रेनेजचे पाणी खुल्या जागेत साचून आहे. तेव्हा त्या ठिकाणीही तातडीने फवारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.