कलम 370 रद्द झाल्यानंतरचा पहिला दौरा : द्विपक्षीय संबंध सुधारण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ जम्मू
पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरमधील दोन जलविद्युक प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी जम्मू येथे दाखल झाले आहे. सिंधू जल कराराच्या अंतर्गत तटस्थ तज्ञ कार्यवाहीचा हिस्सा म्हणून पाकिस्तानी शिष्टमंडळ या दौऱ्यावर आले आहे. 1960 च्या कराराच्या अंतर्गत 5 वर्षांच्या कालावधीनंतर कुठल्याही पाकिस्तानी शिष्टमंडळाचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.
![](https://www-tarunbharat-com.imagibyte.sortdcdn.net/wp-content/uploads/2024/06/Indo-Pakistan-teams-300x201.jpg?type=webp&quality=80)
9 वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्ताकडून स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारात जागतिक बँक देखील सामील आहे. हा करार अनेक सीमापार नद्यांच्या जलवापरासंबंधी दोन्ही देशांदरम्यान सहकार्य आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी एक रुपरेषा तयार करतो. पाकिस्तानी शिष्टमंडळ जम्मूमध्ये दाखल झाल्यावर भारत-पाकिस्तानी संबंध पूर्ववत होण्याची अपेक्षा काही जण व्यक्त करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासंबंधी वक्तव्य केले आहे.
यापूर्वी तीन सदस्यीय पाकिस्तानी शिष्टमंडळाने जानेवारी 2019 मध्ये सिंधू जल कराराच्या तरतुदींतर्गत पाकल दुल आणि लोअर कलनई जलविद्युत प्रकल्पांचे निरीक्षण केले हेते. तर ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम 370 हद्दपार केले होते. जम्मूत पोहोचलेले पाकिस्तानी शिष्टमंडळ केंद्रशासित प्रदेशातील स्वत:च्या दौऱ्यादरम्यान चिनाब खोऱ्यातील किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पांचे निरीक्षण करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
2016 मध्ये पाकिस्तानकडून मागणी
पाकिस्तानने 2016 मध्ये जागतिक बँकेकडे दोन जलविद्युत प्रकल्पांच्या डिझाइनवरील स्वत:च्या आक्षेपासंबंधी ‘तटस्थ तज्ञा’च्या माध्यमातून तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानने मध्यस्थी न्यायालयाच्या माध्यमातून निर्णय घेण्याची मागणी केली होती. दुसरीकडे भारताने हा मुद्दा केवळ तटस्थ तज्ञाच्या कार्यवाहीच्या माध्यमातून सोडविण्यात यावा यावर भर दिला होता. चर्चा अयशस्वी ठरल्यावर जागतिक बँकेने ऑक्टोबर 2022 मध्ये एक तटस्थ तज्ञ आणि मध्यस्थी न्यायालयाच्या अध्यक्षाची नियुक्ती केली. एप्रिल महिन्यात न्यायालयाने पाकिस्तानव्याप्त काश्मीमध्ये नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली होती. तर जम्मू-काश्मीर प्रशासनाने पाकिस्तानच्या शिष्टमंडळासोबत तटस्थ तज्ञांच्या दौऱ्यासाठी 25 संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत.
संबंध अद्याप दुरावलेलेच
2019 पासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध दुरावलेलेच आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम 370 रद्दबातल ठरविण्यात आल्यावर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते. दोन्ही देश सातत्याने कठोर भूमिका दाखवत असले तरीही द्विपक्षीय संबंध काही प्रमाणात सुधारण्यासाठी पावले उचलू शकतात असे माले जात आहे. पाकिस्तानात चालू वर्षीच शाहबाज शरीफ यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांचे बंधू नवाज शरीफ यांची भारताबद्दलची भूमिका पाहता द्विपक्षीय संबंध सुधारतील आणि जम्मूमध्ये पाकिस्तानी शिष्टमंडळाचा दौरा याची सुरुवात असल्याचे जाणकारांचे मत आहे.