वायुदल प्रमुख व्ही.आर. चौधरींचे प्रतिपादन : स्वदेशी संरक्षण उत्पादनाला मिळावे प्रोत्साहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वायुदलप्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी मंगळवारी भारतीय वायुदल, कॉलेज ऑफ एअर वॉरफेयर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजकडून संयुक्तपणे आयोजित कॅम्पस्टोन सेमिनारला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी भारताच्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाला प्राथमिकता देण्याचे आवाहन केले. भारताची रणनीतिक संस्कृती आणि वर्तमान सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी त्याची प्रासंगिकताही त्यांनी मांडली आहे.
आमची रणनीतिक संस्कृती ऐतिहासिक अनुभव आणि सातत्याने विकसित होत असलेल्या भू-राजनयिक वातावरणामुळे आकार घेते. ही रणनीतिक स्वायत्तता, खबरदारी आणि सार्वभौमत्वावर मजबूत लक्ष देण्यावर जोर देते असे म्हणत वायुदल प्रमुख चौधरी यांनी सीमा वाद आणि दहशतवादापासून सायबर धोक्यांवरही विचार मांडले.
व्यापक दृष्टीकोन अवलंबिण्याची गरज
भारतासाठी स्वत:च्या सशस्त्रदलांचे आधुनिकीकरण करणे, रणनीतिक भागीदाराला बळ देणे, स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि सुरक्षेसाठी एक व्यापक दृष्टीकोन अवलंबिण्याच्या अनिवार्यतेवर त्यांनी जोर दिला. अशांत काळांना सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:च्या राष्ट्रीय हितांना सुरक्षित करण्यासाठी भारताने सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणात गुंतवणूक करायला हवी तसेच रणनीतिक भागीदारी मजबूत करत अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षा दोन्हींसाठी एकीकृत दृष्टीकोन स्वीकारायला हवा असे उद्गार चौधरी यांनी काढले आहेत.
विदेशमंत्र्यांच्या योगदानाचा उल्लेख
भारतात रणनीतिक संस्कृती असो किंवा नसो, आमचे वास्तविक राजकारण, शासनकला आणि कूटनीति नेहमीच आमच्या ऐतिहासिक, देशांतर्गत आणि समकालीन भू-राजकारणाचा महत्त्वाचा हिस्सा राहिली आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी स्वत:चे पुस्तक ‘व्हाय भारत मॅटर्स’मध्ये समकालीन, जटिल जागतिक स्थितींसाठी एक नवा दृष्टीकोन सादर केला असल्याचा उल्लेख वायुदल प्रमुखांकडून करण्यात आला.