ब्रिजखाली पावसाचे पाणी साचून मोठे खड्डे पडल्याने अडचण : पाण्याचा निचरा करण्याची मागणी
वार्ताहर/धामणे
देसूर (ता. बेळगाव) येथे असलेल्या रेल्वे ओवर ब्रिजच्याखाली पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.देसूर गावचा रस्ता बेळगाव-खानापूर रस्त्याला जोडला असल्याने या रस्त्याला गावच्या शेजारीच रेल्वे फाटक लागतो. हा रस्ता देसूर गावातून राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, के के कोप्पहून हायवेला जोडला असून देसूर गावापासून एक किलो मीटरवरती हा रस्ता सुळगा, येळ्ळूर गावाला जोडला आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहनांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे या रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक बंद असले की वाहनांची मोठी गर्दी होते.
ही गर्दी टाळण्यासाठी फाटकाच्या शेजारी रेल्वे लाईनच्या खालून वाहने जाण्यासाठी ब्रिज बांधण्यात आले आहे. परंतु ब्रिजच्या आत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे या ब्रिजमधून चारचाकी व दुचाकी वाहने जाणे-येणे धोक्याचे बनल्याचे वाहनधारकांकडून सांगण्यात आले.कारण या ब्रिजच्या खाली खड्डे पडले असल्याने या साचलेल्या पाण्यातून वाहन चालविणे धोक्याचे आहे. फाटक बंद असताना थांबलेल्या वाहनधारकांना विचारले असता वरील समस्या सांगण्यात आली. या ब्रिजच्या आत साचत असलेले पाणी बाहेर जाईल अशी व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत असल्याने या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवून ही समस्या दूर करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, असे देसूरमधील बऱ्याच वाहनधारकांकडून मागणी आता जोर धरू लागली आहे.