मुलींचा मोफत प्रवास : बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली, परिवहनला फटका
बेळगाव : शक्ती योजनेमुळे मागील दोन वर्षांत बसपास काढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे एकूण परिवहनच्या महसुलातही मोठी घट झाली आहे. शक्ती योजनेपूर्वी म्हणजेच 2022-23 सालात बेळगाव आगारातून 33,247 विद्यार्थ्यांनी बसपास काढला होता. मात्र मागील वर्षी ही संख्या 18,599 वर आली आहे. त्यामुळे बसपास काढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसपासमधून महसूलही घटला आहे.बेळगाव आगारातून 2022-23 सालात 33,247 विद्यार्थ्यांनी बसपास काढले होते. यातून तब्बल 2 कोटी 35 लाख 15 हजार 700 रुपये महसूल प्राप्त झाला होता. मात्र, शक्ती योजनेमुळे गतवर्षी केवळ 18 हजार 599 विद्यार्थ्यांनी बसपास काढले होते. त्यामुळे महसूलही 1 कोटी 55 लाख 22 हजार 250 रुपये इतका खाली आला आहे. शक्ती योजनेमुळे महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्याबरोबर विद्यार्थिनींचाही मोफत प्रवास सुरू आहे. केवळ विद्यार्थीच बसपास घेऊ लागले आहेत. परिणामी बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे.
बेळगाव विभागातील चार आगारासह बैलहोंगल, खानापूर अशा सात आगारातून 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढत होते. त्यामुळे परिवहनला कोट्यावधींचा महसूल मिळत होता. मात्र आता शक्तीमुळे बसपास काढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने निम्याने खाली आला आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास वितरण प्रक्रियेलाही प्रारंभ होतो. यंदादेखील शैक्षणिक वर्षाबरोबर बसपास वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र गतवर्षीपासून काँग्रेस सरकारने राज्यात शक्ती योजना जारी केली आहे. याअंतर्गत महिलांचा मोफत प्रवासही सुरू झाला आहे. त्यामुळे एकूण बसपास काढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नही खाली आले आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासच्या माध्यमातून परिवहनला कोट्यावधींचा महसूल मिळत होता. विशेषत: परिवहनला ही रक्कम वर्षभरापूर्वीच मिळत होती. त्यामुळे नवीन बस खरेदी आणि इतर कामेही यातून होत होती. मात्र गतवर्षीपासून बसपासची संख्या घटल्याने उत्पन्नही कमी झाले आहे. त्यामुळे परिवहनकडे आर्थिक चणचणही भासू लागली आहे.
केवळ विद्यार्थीच बसपास घेऊ लागले आहेत
बेळगाव आगारामध्ये शक्ती योजनेपूर्वी 33 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढत होते. मात्र ती संख्या आता निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे बसपासच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थिनींचा शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थीच बसपास घेऊ लागले आहेत.
– अनंत शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)