वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘मोदी 3.0’ सरकार स्थापन होताच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद सुरू ठेवणार आहेत. त्यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवार, 30 जूनपासून पुन्हा सुरू होत आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींचा हा पहिलाच मन की बात कार्यक्रम असणार आहे. रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाला यापूर्वी देशभरात मोठा प्रतिसाद मिळत आला आहे. प्रासंगिक घटनांच्या अनुषंगाने पंतप्रधान या कार्यक्रमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात. तसेच या कार्यक्रमासाठी स्वत:चे विचार आणि इनपूट शेअर करण्याचे आवाहन जनतेला करत असतात. यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यानंतर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने या कार्यक्रम बंद करण्यात आला होता.