बिहारनंतर झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल कोसळला
वृत्तसंस्था/ रांची
बिहारनंतर आता झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल कोसळला आहे. गिरिडीह जिह्यातील देवरी ब्लॉकमधील अर्गा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर मुसळधार पावसानंतर माती खचल्यामुळे गर्डर तुटून पूल उद्ध्वस्त झाला. हा पूल झारखंडमधील गिरिडीह आणि बिहारमधील जमुई जिह्यातील दुर्गम गावांना जोडणार होता. या घटनेमध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 235 किमी अंतरावर असलेल्या देवरी ब्लॉकमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली.
पुलाचे बांधकाम सुरू असताना शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाचा गर्डर तुटल्यामुळे एक खांब कोसळल्याचे गिरीडीहच्या रस्ते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनय कुमार यांनी सांगितले. या घटनेनंतर कंत्राटदाराला सदर भाग पुनर्बांधणी करण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पुलाचा प्रकल्प खर्च जाहीर केला नाही. तथापि, सुमारे पाच कोटी ऊपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फतेहपूर-भेलावती रस्त्यावर डुमरीटोला आणि करीपहारी गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात येत होता. बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या 10-15 दिवसांत बिहारमधील पाच पूल कोसळले आहेत.