दोन रेल्वेंमधील वेळेचे अंतर वाढविण्याची मागणी
बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाण्यासाठी दररोज दोन रेल्वे उपलब्ध आहेत. परंतु, अवघ्या तासाभराच्या अंतरावर दोन्ही एक्स्प्रेस निघून जात असल्याने त्यानंतर मुंबईला जाण्यासाठी एकही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे दोन एक्स्प्रेसच्या वेळांमध्ये काहीसे अंतर ठेवल्यास याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला बेळगाव, हुबळी परिसरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हुबळी-दादर या मार्गावर दादर एक्स्प्रेस धावते. सायंकाळी 6.20 वा. बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता दादरला पोहोचते. त्यापूर्वी केवळ तासभर आधी म्हणजेच सायंकाळी 5.20 वाजता चालुक्य एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल होते व दुसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता दादरला पोहोचते.
परतीच्या प्रवासातही या एक्स्प्रेस तासाभराच्या अंतराने धावतात. यामुळे प्रवाशांना या एक्स्प्रेसचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. हुबळी-दादर एक्स्प्रेस निघून गेल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत रेल्वेची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या दोन एक्स्प्रेसमधील वेळेचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. हुबळी एक्स्प्रेस मिरज व पुणे या दोन रेल्वेस्थानकांवर विनाकारण तासभर थांबविली जाते. याऐवजी या एक्स्प्रेसची गती वाढविल्यास प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार
हुबळी एक्स्प्रेस सायंकाळी 6.20 वाजता बेळगावमधून निघते. त्याऐवजी ही एक्स्प्रेस उशिराने निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत दादरला पोहोचली तर प्रवाशांची सोय होईल. लवकरच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली जाणार आहे.