राहुल कुनंगो : ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’तर्फे कार्यशाळा : जीएसएस कॉलेजमध्ये आयोजन
बेळगाव : टुरिझम व हॉस्पिटॅलिटी हे क्षेत्र देशात 41 हजार कोटी रुपयांमध्ये विभागले गेले आहे. या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता आहे. केवळ फूड इंडस्ट्रीपुरते हे क्षेत्र मर्यादित नसून यामध्ये अनेक विभाग कार्यरत आहेत. कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटीला महत्त्व आले असून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या क्षेत्राचा जरूर विचार करावा, असे प्रतिपादन बेळगावमधील आयटीसी वेलकम या पंचतारांकित हॉटेलचे जनरल मॅनेजर राहुल कुनंगो यांनी केले. लोकमान्य ट्रस्टच्या ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ सावंतवाडीच्यावतीने बुधवारी जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना राहुल कुनंगो यांनी ‘हॉस्पिटॅलिटी व टुरिझम उद्योगातील करिअरच्या संधी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, लोकमान्य ट्रस्टच्या संचालक सई ठाकुर-बिजलानी, गोवा येथील कर्मा हॉस्पिटॅलिटीचे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर निशांत डुडवानी, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध दास उपस्थित होते.
लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर म्हणाले, लोकमान्य सोसायटीने बँकिंग क्षेत्रासोबतच हॉटेल इंडस्ट्री, शिपिंग, इन्शुरन्स, टुरिझम, रिअल इस्टेट यासह इतर उद्योगांमध्ये भरीव गुंतवणूक केली आहे. बॅ. नाथ पै यांच्या नावाने 300 एकर जागेत इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सुरू केली जाणार आहे. याबरोबरच चंदगड येथे बीबीए, बीसीए कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. जांबोटी, खानापूरमध्ये कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. आता माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्यावतीने विद्यार्थ्यांना व्यवसाय स्थापण्यासाठी पदवीसह डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. या क्षेत्रात रोजगार असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘कर्मा’ हॉस्पिटॅलिटीचे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर निशांत डुडवानी यांनी ‘कर्मा’अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या वाईल्डर नेस्ट, हॉटेल समुद्र, शतावरी रिसॉर्ट, पॉप ईन, ऑर्चर्ड रिसॉर्ट, कुंजन, सूर्यकिरण (गोवा) या सर्व हॉटेलच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या निकषांवर हॉटेल व्यवस्थापन निवड करते, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी लोकमान्य ट्रस्टच्या संचालक सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या, एक काळ असा होता की, इंजिनिअरिंग व मेडिकल या दोन शाखांना प्रचंड मागणी होती. करिअर म्हणजे हीच क्षेत्रे असा समज होता. मात्र, आज अन्य शाखांना मागणी वाढली आहे. त्यातही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करणे सुलभ झाले आहे. शिवाय येथे रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर स्वत:च हॉटेल उद्योग सुरू करून उद्योजक होण्यासही वाव आहे. आपण स्वत: जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी असून याच कॉलेजमधून लोकमान्यच्या ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ची सुरुवात होते, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्राचार्य अनिरुद्ध दास यांनी, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी व टुरिझम या क्षेत्रांविषयी माहिती दिली. तसेच ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ कॉलेज विषयी माहिती दिली. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बेळगावमधील ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विठ्ठल हेगडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक अजय पै, अभय पै, अशोक पै यांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रंजिता हिने स्वागतगीत सादर केले. रेखा जोशी यांनी स्वागत केले. लोकमान्यचे एज्युकेशन को-ऑडिनेटर डॉ. डी. एन. मिसाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रिया परुळेकर व डॉ. संदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य बी. एल. मजुकर, डॉ. अभय पाटील, एस. एन. देसाई, सुजाता विजापूर यांच्यासह बेळगावमधील हॉटेल व्यावसायिक, कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बेळगावमध्ये हायटेक कॅन्सर हॉस्पिटल
बेळगावमध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना महानगरांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यासाठी बेळगावमध्ये हायटेक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठीचे प्रयत्न लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून सुरू आहेत. दिल्ली येथील कॅन्सर तज्ञ यांच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची घोषणा डॉ. किरण ठाकुर यांनी केली.