परोपकाराच्या कथा वाचायला लागलं की निसर्गातली प्रत्येक गोष्टच ही दुसऱ्यासाठी म्हणजेच तुझ्यासाठी म्हणत जगत उभी असते किंवा कार्यरत असते. अशीच एक कथा वि. स. खांडेकरांची वाचनात आली होती. दोन ढग जे ढग स्वत: मी मी करत पुढे जात असतात ते परोपकार करणाऱ्या ढगांना मागे सारतात. कारण त्या ढगांना स्वर्गात जाण्याची घाई लागलेली असते. शेवटी पाण्याने जड झालेले ढग पृथ्वीवरच्या शेतकऱ्याला आपल्या जवळचं पाणी देऊन पुढे निघून जातात. त्यांना केव्हाच स्वर्गात प्रवेश मिळालेला असतो. अशीच एक घटना एकदा आफ्रिकेमध्ये घडली. छोटी मुलं खेळत होती. दुष्काळी भाग असल्यामुळे अन्नासाठी कायमच वणवण त्यांच्यामागे लागलेली, परंतु त्यातही सगळ्यांनी मिळून आनंद शोधायचा हे ठरलेलं. अशा मुलांना एक माणूस खाऊ देण्याचे आमिष दाखवतो. त्या झाडापर्यंत पळून यायचं जो आधी येईल त्याला हा सगळा खाऊ….. समोरच खाऊ ठेवलेला…..थोडसंच अंतर पळायचे पण तेवढीही ताकद त्यांच्यात नसते. शेवटी ती सगळी मुलं एकत्र येऊन एकमेकांचा हात धरून पळत पुढे जातात आणि तो खाऊ वाटून खातात. दुसराही जगला पाहिजे ह्या इच्छेने ते पळत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा खरा आनंद मिळतो.
अशीच एक कथा फार पूर्वी भारतामध्ये घडली होती. स्कायलॅब नावाचा ग्रह काही तांत्रिक कारणामुळे पृथ्वीवर येऊन कोसळणार असतो. तो ग्रह ज्या भागात कोसळणार होता तिथे लोकांना सरकारने आधीच नुकसान भरपाई देणार हे सांगितलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती मुद्दामच उघड्या माळरानावर जाऊन झोपायला लागतो. नवरा बायकोला सांगायचा की तू घरात झोप मी तिथे जाऊन झोपतो. माझ्यामागे तुमचं कल्याण होईल. प्रत्येक जण दुसऱ्यासाठी धडपडत होता.
अशातच एक भिकारीण रस्त्याने धावत होती. स्कायलॅब कोसळण्याची वेळ जवळजवळ येत चालली होती. ती ज्या झाडाखाली आडोशाला बसली होती तिथेच जवळपास ही दुर्घटना घडली. तिची पोरं देवळात वाट बघत बसली होती. पण आता तिचे जे पैसे होते ते तिच्या कुटुंबाला मिळणार होते. हे सगळं वाचल्यानंतर अति श्रीमंत माणसं जे स्वत:चा जीव वाचवून आयुष्य कसं वाढेल या विचारात जगत असतात अशांसाठी ह्या गोष्टी खरोखर प्रेरणादायी ठरतात. जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. गुरुगोविंद सिंग लहानपणी नेहमी सांगायचे की मला एक ते बारा अंकापर्यंतच अंक म्हणता येतात. तेरा हा शब्द माझ्या मुखातून बाहेरच पडत नाही कारण दुसऱ्याला काही द्यायचं ही गोष्ट आपल्या क्रियेमुळे सिद्ध होत असते. नुसतं बोलणारे वाचाळवीर काहीच करत नसतात. ज्या दिवशी 13 हा शब्द म्हणायला लागले त्या दिवशीच त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं. जगामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्या आहेत, त्या तुझ्या आहेत, माझा येथे काहीही संबंध नाही असं ज्यावेळी माणसाला समजतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो जगतो.