मात्र कारागृहातून लवकर सुटका होण्याची शक्यता कमी : मुख्यमंत्रिपदी रहायचे की नाही, याचा त्यांनीच विचार करावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या गाजलेल्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या प्रकरणात अंतरिम जामीन संमत केला आहे. मात्र, केजरीवाल यांना सीबीआयनेही अटक केलेली असल्याने त्यांची कारागृहातून लवकर सुटका होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्रिपदी रहायचे की नाही, याचा विचार त्यांनीच करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. केजरीवाल यांचा जामीन संमत झाल्याने त्यांच्या पक्षाने आनंदोत्सव साजरा केला आहे. मात्र, दिल्लीच्या सीबीआय न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ करावी, असा आदेश सीबीआय प्रकरणात दिला आहे.
केवळ चौकशी हा अटकेचा आधार होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच ईडीला अशाप्रकारे अटक करण्याचा अधिकार आहे किंवा नाही, यासंबंधीचा विचार करण्यासाठी या प्रकरणाचा हा भाग मोठ्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णयही न्यायालयाने घेतला आहे. न्या. संजीव खन्ना यांनी त्यांच्या निर्णयपत्रात ही बाब स्पष्ट केली आहे. मोठे घटनापीठ केजरीवाल यांच्या कोठडीसंबंधी निर्णय घेऊ शकते. त्यामुळे सध्या त्यांना केवळ अंतरिम जामीन संमत करण्यात आला आहे, असेही निर्णयपत्रात नमूद करण्यात आले आहे.
फेब्रुवारीपासून कारागृहात
फेब्रुवारी महिन्यापासून केजरीवाल हे कारागृहात आहेत. प्रथम त्यांना प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) अटक केली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना सीबीआयनेही अटक करून त्यांची कोठडी मिळविली आहे. त्यामुळे ईडी प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांची कारागृहातून सुटका केव्हा होईल, हे अनिश्चित आहे.
सीबीआय प्रकरणात कोठडीत वाढ
सीबीआयनेही केजरीवाल यांच्या विरोधात कारवाई केली असून या कारवाई अंतर्गत ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची सुनावणीही शुक्रवारी दिल्लीच्या कनिष्ठ सीबीआय न्यायालयात झाली. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ केली.
आपची भाजपवर टीका
सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देऊन भारतीय जनता पक्षाला धडा शिकविला आहे. तसेच मद्यघोटाळा प्रकरणात आता हा पक्ष उघडा पडला आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे. मद्यधोरण प्रकरणात कोणताही घोटाळा झालेलाच नाही. भारतीय जनता पक्षाने हे कुभांड आम आदमी पक्षाच्या विरोधात रचले आहे, अशी टीकाही आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केली.
भाजपचे प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्षाने आनंदोत्सव साजरा करणे हास्यास्पद आहे. कारण केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. केवळ जामिनावर सुटका करण्याचा आदेश, तो ही एका प्रकरणात देण्यात आला आहे. त्यामुळे जणूकाही केजरीवाल हे निर्दोष सुटले आहेत, असा आव आणून आम आदमी पक्ष सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करत आहे. केजरीवाल यांच्या विरोधात भक्कम पुरावा असून ते निश्चितच दोषी ठरतील आणि आम आदमी पक्षाचा आनंद क्षणभंगूर ठरेल, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाने दिले आहे.
उच्च न्यायालयाकडून अटक वैध
केजरीवाल यांची ईडीकडून झालेली अटक दिल्ली उच्च न्यायालयाने वैध ठरविली होती. त्यामुळे त्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे. मात्र, त्यांच्याविरोधात आता न्यायालयात प्रकरण चालविले जाणार आहे.