विधानसभाध्यक्ष यू. टी. खादर, सभापती बसवराज होरट्टी यांची माहिती : सोमवारपासून अधिवेशन
प्रतिनिधी/ बेंगळूर
16 व्या विधानसभेचे चौथे पावसाळी अधिवेशन 15 जुलै ते 26 जुलै दरम्यान होणार आहे. अधिवेशन एकूण 9 दिवस चालणार आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर आणि विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली. शुक्रवारी विधानसौध येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सभाध्यक्ष यू. टी. खादर म्हणाले, 15 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यावेळी आतापर्यंत निधन झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात सरकारकडून स्वीकारण्यात झालेली विधेयके चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी घेतली जातील. या सत्रात एकूण 9 दिवस प्रश्नोत्तरांचे सत्र ठेवण्यात आले आहे. याशिवाय लक्षवेधी सूचना, शून्यवेळ, स्थायी सूचना, नियम 69 सूचना, खाजगी सदस्यांचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 2023-24 सालातील विधिमंडळ, विधानसभा स्थायी समित्यांचा कार्यकाळ 8 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे सन 2024-25 साठी निवडणूक प्रस्ताव सादर करून नवीन समित्यांच्या स्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदारांना मिळणार चहाचा कप
अधिवेशनाला वेळेवर उपस्थित राहणाऱ्या आमदारांना चहाचा कप दिला जाणार आहे. मागच्या वेळेप्रमाणेच आताही सर्वांना संधी दिली जाणार आहे. दिवसभर हजर राहणाऱ्या सदस्यांना विशेष संधी दिली जाईल. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमदार किती वाजता येतात आणि जातात, हे कळणार आहे. एक सदस्य किती वेळ अधिवेशनात बसतो याचीही माहिती मिळेल, असेही खादर म्हणाले.
खेळांच्या प्रोत्साहनासाठी विधिमंडळ चषक
खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार, विधिमंडळ कर्मचाऱ्यांच्यासाठी विधिमंडळ चषक ठेवण्यात आला आहे. विधिमंडळाच्या हॉलमध्ये 20 जून रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यात सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना बक्षीस दिले जाईल. अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे व्यवस्था असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
2023-24 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार निवडण्यासाठी निवड समिती स्थापन केली जाईल. 70 वर्षांनंतर आम्ही विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ काही बदल केले आहेत. 15 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे उद्घाटन होणार आहे, असेही सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी स्पष्ट केले.