वृत्तसंस्था/येनगॉन (म्यानमार)
यजमान म्यानमार आणि भारत महिला फुटबॉल संघातील शुक्रवारी खेळविण्यात आलेला मित्रत्वाचा फुटबॉल सामना अखेर 1-1 असा गोल बरोबरीत राहिला.
म्यानमारच्या दौऱ्यामध्ये गेल्या मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात म्यानमारने भारताचा 2-1 असा पराभव केला होता. शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात मध्यंतरापर्यंत पावसाचा बराच अडथळा आला होता. पण म्यानमारच्या बचावफळीची कामगिरी अभेद्य असल्याने भारताला आपले खाते उघडता आले नाही. मध्यंतरावेळी गोलफलक कोराच होता. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपल्या डावपेचात बदल केला आणि त्यांना यशही मिळाले. 48 व्या मिनिटाला भारताच्या प्यारी झेकाने म्यानमारच्या बचावफळीला तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत अप्रतिम गोल केला. भारताला ही आघाडी फारवेळ राखता आली नाही. 50 व्या मिनीटाला विन तुनने गोल नोंदवून म्यानमारला बरोबरी साधून दिली. शेवटच्या 40 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर हा सामना 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. 61 व्या मिनीटाला म्यानमारने निर्णायक गोल करण्याची संधी गमविली.