रस्त्यावर तात्पुरती खडी, चिपींग टाकून रस्ता त्वरित तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगावमधील नागरिकांचे जागृत पुरातन काळातील रामलिंग मंदिराकडे जाणारा तसेच शेतवडीत ये-जा करण्यासाठी शेतकरी वर्गाचा अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर माती टाकल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठी दलदल निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून सध्या चालणेदेखील मुश्किल झाले आहे. तरी एपीएमसी व ग्रामपंचायतींनी तातडीने या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे, अशी मागणी या भागातील भाविक व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
उचगाव गावच्या पूर्व दिशेला उचगाव-गोजगे मार्गांशी असलेल्या अॅप्रोच रस्त्यालगत 100 मीटर अंतरावरती पुरातन काळातील रामलिंग मंदिर आहे. अलीकडेच या मंदिराचा जिर्णोद्धारही करण्यात आला असून मंदिराच्या प्रांगणात मोठा पाण्याचा तलाव आहे. या मंदिराकडे गावातील भाविकांची दर सोमवारी दर्शनासाठी ये-जा सुरू असते. याबरोबरच याचमार्गे पूर्व भागात पसरलेल्या शेतवडीतील पिकांची लागवड, कापणी व इतर सर्व कामासाठी या रस्त्यावरूनच शेतवडीत शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते.
सध्या शेतात जाण्यासाठी या भागातील हा मुख्य रस्ता असून याच मार्गे शेतवडीत जाऊन भाताची रोप लागवड व इतर शेतीची कामे केली जातात. तर रोज पहाटे शेतकरी वर्गाला जनावरांचा चारा आणण्यासाठीही याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. मात्र सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने या रस्त्यावरून चालणेदेखील मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर इतका चिखल झाला आहे की शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या महिला कामगार वर्ग चिखलाच्या धास्तीने या शेतात काम करण्यासाठी येण्यास नापसंती दाखवत आहेत. यामुळे मुळात कामगार वर्ग मिळणे कठीण आणि त्याच्यात रस्त्याची झालेली ही दुर्दशा पाहता शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
एपीएमसीचे साफ दुर्लक्ष
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या भागातील अद्याप एकही रस्ता झालेला नाही. शेतवडीत ये-जा करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निधीतून रस्ते करण्यासाठी मुभा आहे. मात्र उचगाव परिसरातील शेतवडीत जाणाऱ्या अनेक रस्त्यांच्या कामाकडे एपीएमसीचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची त्वरित दुऊस्ती करावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी करण्यात येत आहे.
दलदलीमुळे शेतात काम करण्यास महिलांचा नकार
आम्हा सर्व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याशिवाय दुसरा शेतवडीत जाण्यासाठी मार्ग नाही. परिणामी सध्या या रस्त्यावर माती टाकल्याने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी कोणी महिला येण्यास नकार देत आहेत, असे झाले तर शेती कशी करावी हा मोठा प्रŽ पडला आहे. यासाठी तातडीने या रस्त्यावर तात्पुरती दगड, खडी टाकून ये-जा करण्यासाठी संबंधित खात्याने रस्ता करून द्यावा, अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांच्यावतीने विनंती आहे.
– बाबू कोवाडकर, शेतकरी.
रस्त्याचे तातडीने सिमेंटीकरण करावे
उचगाव ग्रामस्थांचे आणि भाविकांचे रामलिंग देवस्थान हे महत्त्वाचे असून प्रत्येक सोमवारी आम्ही सर्व भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतो. मात्र यापूर्वी सदर रस्ता चांगला होता. मात्र पावसाळा सुरू होण्याअगोदर या रस्त्यावर तलावातील काढलेली माती टाकल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने चिखलातून जाणे कठीण होऊन बसले आहे. तरी या रस्त्याची तातडीने सिमेंटीकरण करावे, अशी भाविकांची मागणी आहे.
– मुकुंद नवार, भाविक