तळावडे रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती : घरांची पडझड : शुक्रवारपर्यंत 1935.2 मि. मी. पावसाची नोंद
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी आणि परिसरात गेल्या चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर घेतला असून शुक्रवारी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिन्यापासून शुक्रवार 12 जुलैपर्यंत कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात 1935.2 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात 814.2 मिलिमीटर पाऊस झालेला होता. जुलै महिन्यात अद्याप 1121 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत या भागात पावसाने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी चांगली साथ दिली आहे. कणकुंबी भागातील भाताची रोप लागवडीची कामे पूर्णत्वास आली आहेत. पावसामुळे पारवाड, चिगुळे व इतर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. तसेच कणकुंबी आणि परिसरातील नागरिकांना अद्यापही विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यापासून विद्युतपुरवठ्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसाळ्dयात दरवर्षीच विजेच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. या भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखले, पारवाड, सुरल, चिगुळे, मान, हुळंद व चोर्ला आदी गावातील धबधबे प्रवाहित झालेले असून वनखात्याने पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. सध्या माण येथील सिंबोला धबधबा, सुरल येथील लाडकीचा धबधबा व चिखले पारवाड दरम्यान असलेला सवतुरा धबधबा ओसंडून वाहत आहेत. कणकुंबी आणि परिसरात गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोर घेतलेला असून जूनपासून अद्याप जवळपास दोन हजार मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे.
विद्यार्थ्यांची केली सोय
मागील आठ-दहा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोल्याळी ते तळावडे दरम्यान असलेल्या गोल्याळी गवळीवाड्या नजीकच्या पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला होता. त्यामुळे तळावडे गावाहून गोल्याळी हायस्कूलला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आठ दिवस विद्यार्थ्यांची सोय विश्वभारत सेवा समिती संस्थेने केली. तळावडे गावाला असलेली खानापूर आगाराची खानापूर, गोल्याळी, तळावडे ही बससेवा बंद करण्यात आली होती.
तळावडे रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती
पुलाचा कठडा वाहून गेल्याने बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे तळावडे गावाहून गोल्याळी हायस्कूलला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गोल्याळी हायस्कूलच्या संस्थेचे म्हणजे विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांनी स्वखर्चाने जेसीबी, ट्रॅक्टर तसेच मजूर घेऊन वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. गोल्याळी गावाजवळील गवाळी वाड्यानजीकच्या पुलावर पाणी आल्याने पुलाचा कठडा अर्धा रस्त्यासकट वाहून गेला होता. नंदिहळ्ळी यांनी जवळपास स्वत: 25 ते 30 हजार रुपये खर्च करून पुलाची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली. यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे दगड व माती घालून खचलेला भाग पूर्णपणे भरून काढला. त्यामुळे आता बस किंवा इतर मोठ्या वाहनांना होणारा धोका टळला आहे. गोल्याळी हायस्कूलला येणाऱ्या तळावडे गावच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने केलेल्या कार्याचे गोल्याळी व तळावडे गावांसह भागात कौतुक होत आहे.