पालकमंत्र्यांना दिले निवेदन
बेळगाव : अपुऱ्या बससेवा आणि कोलमडलेले वेळापत्रक यामुळे शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विद्यार्थी वेळेवर शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये राहात नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बसफेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शक्ती योजनेला सुरुवात झाल्यापासून परिवहन मंडळाचे वेळापत्रक कोलमडले आहे. महिलांच्या मोफत प्रवासामुळे शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये उभे राहण्यासही जागा उपलब्ध होत नाही. अनेकवेळा बसच्या प्रवेशद्वाराला लोंबकळत जाणारे विद्यार्थी निदर्शनास येतात. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करत ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबरोबरच जिल्ह्यातील वसतिगृह, विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्ती यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सुवर्णसौध परिसरात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत समस्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी प्रांत संघटक पृथ्वीकुमार, विद्यार्थी समन्वयक रोहित उमनाबादीमठ, जिल्हा संघटक सचिन हिरेमठ, रोहित अलकुंटे, कुशल गोदगेरी, संदीप दंडगल यांसह इतर उपस्थित होते.