बेळगाव : म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन (मुडा) मध्ये चार हजार कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. सिद्धरामय्या सरकारकडून अशाप्रकारे राज्यात मोठे घोटाळे सुरू असून या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी राणी चन्नम्मा चौक येथे निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नगरविकास खाते आपल्याजवळील भैरती सुरेश यांच्याकडे दिले आहे. मुडा भूखंड घोटाळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारातील पैसे हायकमांडपर्यंत पोहोचविले जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला.
आमदार अनिल बेनके म्हणाले, भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे दोषींवर कारवाई करावी. या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री भैरती सुरेश व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. चन्नम्मा चौक येथे काही काळ रास्ता रोको करून त्यानंतर टायर पेटवून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, रमेश देशपांडे, इरय्या खोत, मुरगेंद्र गौडा पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.